वज्रेश्वरी, ता. १४ : भिवंडीतील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. कोंडीमुळे वाहनचालकांना तासनतास अडकून पडावे लागत असल्याने वाहतूक पोलिस यंत्रणेविरोधात नागरिकांचा रोष वाढल्याने खासदार सुरेश म्हात्रे यांनी मुंबई-नाशिक महामार्गावरील मानकोली नाक्यावर उतरून वाहतूक सुरळीत करण्यासंदर्भात पोलिसांना सूचना दिल्या.
भिवंडी शहर व ग्रामीण भागात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या मोठ्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर मानकोली येथे महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत सद्यःस्थितीत निर्माण होणाऱ्या विविध अडचणींचा आढावा घेतला. या वेळी महामार्गावर उद्भवणाऱ्या कोंडीबाबतच्या उपाययोजना सुचवण्यात आल्या. तसेच रस्त्याची अर्धवट असलेली कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना खासदार सुरेश म्हात्रे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीला वाहतूक पोलिस, सार्वजनिक बांधकाम तसेच राज्य महामार्ग विभागाचे अधिकारी उपस्थित होते.