राज्यात लाखो महिलांकडून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला जात आहे. मात्र, या योजनेचा लाभ काही महिलांनी अपात्र असतानाही घेतल्याचे उघडकीस येत आहे. सरकारी पदावर कार्यरत असताना गलेलठ्ठ पगार घेऊनही काही महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आलं आहे. राज्यातील २ हजारांहून अधिक महिला कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्याचे उघडकीस आलंय. या सरकारी कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. या प्रकारावर अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
लाडकी बहीण योजनेचा सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या लाभावर अजित पवारांनी भाष्य केलं. अजित पवार म्हणाले, 'लाडकी बहीण योजना आली, त्यावेळेस आम्हाला जास्त वेळ मिळाला नाही. त्यानंतर लगेच निवडणुका आल्या. त्यामुळे तपासण्या करण्यासाठी वेळ मिळाला नाही. आम्ही आवाहन केलं होतं. ज्यांना गरज आहे, त्यांनीच लाभ घ्यावा. मात्र आता दिलेले पैसे तर परत घेता येणार नाही. यावर नक्कीच मार्ग काढू. आता कशाला कारवाई करायला सांगताय? चुकलंय, त्यानी नको करायला होता'.
कुटुंबाला शस्त्र परवाना कोणी दिलं, यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याच शस्त्र परवाना वाटपावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं. शस्त्र परवाना कोणी दिला, मी याची माहिती घेईल. लायसन्स द्यायचा जसा अधिकार आहे, तसा तो रद्द करायचाही पण आहे. कुणाकुणाला लायसन्स दिले आहे, याची माहिती घेऊन त्यांना गरज आहे का हे तपासले जाईल'.
'आता हगवणे कुटुंबाला पकडलं आहे. त्यांची चौकशी चालू आहे. काही गोष्टी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. त्यांना तपास करू दे, जास्त काहीपणा करायला नको, असे ते पुढे म्हणाले.
वाढत्या कोरोना रुग्णावर चिंता व्यक्त केली. 'कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे काळजी घेतली पाहिजे. लोकांमध्ये प्रतिकारशक्ती पाहिजे'.