अकरावी प्रवेश अर्जासाठी ५ जूनपर्यंत मुदत! राज्यात १०.९४ लाख विद्यार्थ्यांचे अर्ज; कास्ट व्हॅलिडिटीसाठी ३ महिन्यांचे वेटिंग; ११ ऑगस्टपासून कॉलेज सुरु होणार
esakal June 03, 2025 07:45 AM

सोलापूर : अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरावे लागत आहेत. पटसंख्या टिकावी, आपल्याकडील विद्यार्थी कमी होऊ नयेत, आपल्या शाळांमध्ये दहावीपर्यंत शिकलेल्या विद्यार्थ्यांची सोय व्हावी म्हणून अनेक महाविद्यालये विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाइन अर्ज भरून देत आहेत. अर्ज भरताना आपले महाविद्यालय पहिल्या प्राधान्यक्रमात टाकून अर्ज मंजूर केला जात आहे. ज्यातून विद्यार्थ्यांची सोय झाली आहे.

राज्यातील १२ लाखांपर्यंत विद्यार्थी या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणे अपेक्षित असून २ जूनपर्यंत १० लाख ९४ हजार ६०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील नऊ लाख ७६ हजार २२२ विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज लॉक केले आहेत. दरम्यान, इयत्ता अकरावी प्रवेशासाठी सोलापूर जिल्ह्यातील ३९६ महाविद्यालयांनी नोंदणी केली असून त्याअंतर्गत २ जूनपर्यंत सुमारे ४० हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. आता अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना ५ जूनपर्यंत दुपारी दोन वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ११ ऑगस्टपासून अकरावीचे वर्ग सुरू होणार असून त्यादृष्टीने शिक्षण विभागाने प्रवेश फेऱ्यांचे नियोजन केले आहे.

सोलापूर जिल्ह्यात विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक

महाविद्यालयांमध्ये प्रवेश अर्ज भरण्याची सोय केलेली असेल तर ते स्वागतार्ह आहे, पण कोणीही विद्यार्थ्यांकडून नियमबाह्य पद्धतीने शुल्क घेतल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर ५० हजार ते एक लाख रुपयांच्या दंडाची कारवाई होऊ शकते. याशिवाय अकरावी व बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यासंदर्भात शिक्षण समितीत ठराव करून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या माध्यमातून सर्व प्राचार्यांना तसे आदेश दिले जातील.

- सचिन जगताप, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

‘जात पडताळणी’साठी ३ महिन्यांचे वेटिंग

जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज दिल्यानंतर दोन ते तीन महिने झाले तरी प्रमाणपत्र मिळत नसल्याची ओरड विद्यार्थ्यांची आहे. अनेकजण आम्ही दोघांनी मिळून अर्ज केले होते, त्यातील एकाला लगेच मिळाले पण आम्हाला अजून मिळाले नाही, अशाही तक्रारी आहेत. आता तर समितीला पूर्णवेळ अध्यक्ष मिळालेले असताना देखील कास्ट व्हॅलिडीटीसाठी एवढा विलंब होण्यामागे आर्थिक कारण आहे का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यसंर्दभात अधिकाऱ्यांना विचारले असतात, ते म्हणतात ‘अनेक अर्जांमध्ये त्रुटी असतात, अनेकांकडून त्रुटींची पूर्तता वेळेत होत नाही, अनेकांची कागदपत्रे संशयास्पद असल्याने त्यावेळी मूळ कागदपत्रे तपासावी लागतात’.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.