कोल्हापूर - देशात यंदा सरत्या हंगामातील साखर उत्पादन घटण्याच्या पार्श्वभूमीवरही पुढील हंगामासाठीचा शिल्लक साठा ४९ लाख टन इतका राहण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०२५ या महिन्यांत देशाअंतर्गत वापराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हा साठा पुरेसा असल्याची माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने दिली आहे.
यंदाच्या हंगामात २६१ लाख टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. साखर उत्पादन कमी असले तरी पुढील हंगामाच्या प्रारंभापर्यंत देशात साखरेची टंचाई भासणार नाही, असा विश्वास साखर महासंघाने व्यक्त केला आहे, ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांसाठी हा साठा पुरेसा होवू शकतो.
उत्पन्नाचे गणित बिघडले
देशात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र कर्नाटक ही राज्ये देशात ऊस उत्पादनात आघाडीवर आहेत. या राज्यांच्या उत्पादनावरच देशातील साखरेचे गणित अवलंबून असते. गेल्या वर्षी पाणीटंचाईमुळे या राज्यात लागवडीत घट झाली.
तसेच महाराष्ट्र, कर्नाटकामध्ये हंगामाच्या प्रारंभीच मोठा पाऊस सलग झाल्याने पाणी साचून राहिल्याने उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. लागवडी कमी झाल्याने घट अपेक्षित असली तरी परतीच्या पावसाने सुमारे वीस टक्क्यांपर्यंत साखर उत्पादनात घट केली. यामुळे केंद्राने सुरुवातीपासून विक्री कोटे नियंत्रित करण्यास सुरुवात केली.
गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या हंगामाच विक्री कोटे कमी देऊन कमी साखर उत्पादन, बाजारात मागणी या बाबत संतुलन राखले. यामुळे उत्पादन कमी होऊनही साखरेची टंचाई सध्या देशात नसल्याचे चित्र आहे. सध्या एक्स मिल साखरेच्या किमती ३,८८० ते ३,९२० प्रति क्विंटलच्या दरम्यान स्थिर आहेत.
पुढील वर्षी ३५० लाख टन उत्पादन
यंदा साखर उत्पादनाने निराशा केली असली तरी पुढील हंगाम मात्र साखर उत्पादन वाढीच्या दृष्टीने चांगला जाईल, असा अंदाज आहे. पुढील वर्षी तब्बल ३५० लाख टनांपर्यंत साखर उत्पादन होवू शकतो. ऊस उत्पादक राज्यांमध्ये यंदा ऊस लागवडी वाढल्याने त्याचा सकारात्मक परिणाम साखर उत्पादन वाढीवर होवू शकतो.
इथेनॉल निर्मितीत आखडता हात
साखर उद्योगाने २०२२-२३ या वर्षात ४३ लाख टन साखर इथेनॉल उत्पादनाकडे वळवली आणि त्यातून ३६९ कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन केले. २०२३-२४ या वर्षांत साखरेच्या कच्च्या मालापासून करण्यात आलेल्या इथेनॉलचा पुरवठा २७० कोटी लिटर इतका झाला. ही घसरण २०२४-२५ या वर्षीही चालू राहीली.
यंदा इथेनॉलचा पुरवठा २५० कोटी लिटर इतका होईल, असा अंदाज आहे. उसाच्या एफआरपीत वाढ होणे पण त्या प्रमाणात इथेनॉलच्या खरेदी किमतीत वाढ न होणे, हे आहे. इथेनॉल उत्पादनात फायदा होत नसल्याचे लक्षात आल्याने कारखान्यांनीही हात आखडता घेतला.
उच्चस्तरीय बैठकीत सुचविलेले उपाय
ऊस, मका आणि तांदूळ या सारख्या कच्च्या मालाच्या वाढत्या किमती लक्षात घेऊन इथेनॉलच्या खरेदी किमतीत सुधारणा करण्यात यावी.
२०३५ पर्यंत पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य, टप्प्याटप्याने २० टक्क्यांहून अधिक वाढवावे.
इथेनॉलची मागणी वाढविण्यासाठी आणि उच्च मिश्रणासाठी बाजारपेठेतील तयारी निश्चित करण्यासाठी फ्लेक्स-फ्यूएल व्हेइकल्स (एफ. एफ. व्ही)ला प्रोत्साहन देण्यात यावा आणि त्याच्या उत्पादनाला चालना मिळावी.याशिवाय इंधनात इथेनॉलचा वापर वाढविण्यासाठी भविष्यात डिझेलमध्ये इथेनॉल मिसळण्याच्या शक्यतेचा अभ्यास करण्यात यावा.
अनुकूल मॉन्सून परिस्थिती आणि महाराष्ट्र, कर्नाटक सारख्या प्रमुख उत्पादक राज्यांत वाढलेल्या उसाच्या लागवडीनंतर अपेक्षा वाढल्या आहेत. त्या सोबतच यंदा केंद्र शासनाने उसाची वाढीव एफआरपी वर्षाच्या सुरुवातीलाच जाहीर केल्याने शेतकऱ्यांचा ऊस लागवडीकडे कल वाढलेला आहे. यामुळे पुढील हंगामात साखर उत्पादन वाढीची अपेक्षा आहे.
- हर्षवर्धन पाटील, अध्यक्ष, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ