मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं (Election) बिगुल पुढील काही दिवसांत वाजणार असून दिवाळीपूर्वीच फटाके फुटणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासंदर्भात ओबीसी आरक्षणासह निवडणूक घेण्याचे निर्देश दिल्यानंतर आता निवडणूक आयोगानेही तयारी सुरू केली आहे. त्यानुसार, पावसाळा संपताच म्हणजे सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात निवडणुकांचा बार उडणार आहे. राजकीय पक्षांनी देखील पक्ष संघटन आणि आगामी टार्गेट लक्ष करत तयारी सुरू केली आहे. भाजपने दिल्ली, महाराष्ट्रात सत्ता स्थापन केल्यानंतर आता मुंबई महापालिका शिवसेनेकडून खेचण्याचं लक्ष्य भाजपचं आहे. आपण महायुती म्हणूनच निवडणुका लढवणार असल्याचे मुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यामुळे, मुंबईतील जागावाटपात भाजप (भाजप) नेमकं किती जागा लढवणार हा प्रश्न आहे. मात्र, 150 पेक्षा अधिक जागा लढवल्यास भाजपला मुंबबी) मोठं यश मिळत असल्याचं दिसून येत आहे.
महायुतीमध्ये मुंबईत भाजप मोठा भाऊ तर शिवसेना लहान भाऊ असणार, अशी सूत्रांची माहिती आहे. तर ठाण्यात शिवसेना मोठा भाऊ तर भाजप लहान भाऊ असणार आहे. मुंबईत सध्या भाजपच्या नगरसेवकांची अधिक संख्या असल्याने भाजप अधिक जागा घेणार आहे. मुंबईत भाजपने 150 प्लसचा नारा आधीच दिला आहे. तर सद्यस्थितीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे 40 च्या आसपास माजी नगरसेवक आहेत. त्यामुळे, शिंदे देखील माजी व विद्यमान नगरसेवकांचा दाखल देत मोठ्या प्रमाणात जागा मागू शकतात. शिवसेनेची स्थिती पाहता भाजपपेक्षा कमी जागा घ्याव्या लागणार आहेत. तसेच ठाण्यातील स्थिती पाहता शिवसेनेला अधिक जागा तर भाजपला थोडं कमी जागांवर थांबावं लागणार आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने सर्वेक्षण केले असून भाजपासाठी हा सर्व्हे विजयाची नांदी ठरला आहे. आगामी महापालिकेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने मुंबई भाजपकडून अंतर्गत सर्व्हेक्षण पूर्ण करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे सध्या सुरू असलेल्या राजकीय चर्चांना अनुसरुन भाजपने मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना युबीटी पक्ष एकत्र आल्यास काय परिणाम होईल, यावरही सर्वेक्षण केलं आहे. पण, भाजपने 150 पेक्षा जास्त जागा लढवल्यास भाजपला मोठं यश मिळू शकेल, असे सर्वेक्षणातून समोर आलं आहे.
राज व उद्धव ठाकरे एकत्र आल्यास मुंबईत काय चित्र? याचा घेतला आढावा मुंबई भाजपच्या सर्वेक्षणातून घेण्यात आला. त्यानुसार, दोन ठाकरे बंधू एकत्र आले, तरी भाजपच्या जागांवर परिणाम होणार नसल्याचे सर्वेक्षणातून समोर आलं आहे. मात्र, मुंबई महापालिकेसाठी असलेल्या एकूण 227 जागांपैकी भाजपने 150 च्या वर जागा लढल्यास भाजपला फायदा होत असल्याचे निरिक्षण सर्व्हेत नोंदविण्यात आलं आहे.
आगामी निवडणुकांसाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षासोबत युती करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनादेखील सकारात्मक असल्याची सूत्रांची माहिती आहे. या आधी उद्धव ठाकरे आणि त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी मनसेसोबत युतीसाठी आपण तयार असल्याचे संकेत दिले होते. पण जुना अनुभव लक्षात घेता मनसे हळू हळू आणि सावधतेने पाऊल टाकण्याच्या भूमिकेत असल्याची माहिती आहे. या आधी 2019 निवडणुकीवेळी मनसेकडून शिवसेनेसोबत युतीसाठी प्रयत्न करण्यात आले होते. मात्र तेव्हा उद्धव ठाकरेंकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. हाच कटू अनुभव लक्षात घेऊन, मनसेकडून कोणतीही घाई न करण्याची भूमिका घेतल्याची माहिती आहे.
एसटी बस अपघाताच्या दोन घटना, ट्रकच्या धडकेनं हादरली लालपरी; 2 ठार 15 जखमी
आणखी वाचा