विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! अकरावी प्रवेशाचा मेसेज विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर येणार; अर्ज न केलेल्यांना करता येणार अर्ज, पसंतीक्रमही बदलता येणार
esakal June 06, 2025 02:45 PM

तात्या लांडगे

सोलापूर : इयत्ता अकरावी प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत गुरुवारी (ता. ५) दुपारी संपली. राज्यातील १२ लाख १५ हजार १९० विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले असून त्यातील १२ लाख पाच हजार १६२ विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग-एक भरून अर्ज लॉक केले आहेत. तर ११ लाख २९ हजार ९२४ विद्यार्थ्यांनीच अर्जाचा भाग-२ भरून ते लॉक केले आहेत. ७५ हजार २३८ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांच्या पसंतीक्रमाचा भाग-दोन भरलाच नाही. त्यामुळे तो भाग भरून पूर्ण करण्यासाठी एक संधी दिली आहे. आज (६ जून) दुपारी सव्वाबारा ते ७ जूनच्या दुपारी साडेबारापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील ४७ हजार ६९ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केले, पण त्यातील ४६ हजार ६७५ विद्यार्थ्यांनी शुल्कच भरले नाही. दुसरीकडे ३५१ विद्यार्थ्यांनी अर्जातील ना भाग एक भरला ना भाग दोन. आता प्रवेशाच्या यादीत ४६ हजार ४३ विद्यार्थी राहिले आहेत. त्यांची प्रवेशाची शून्यफेरी (पहिली गुणवत्ता यादी) ८ जूनला प्रसिद्ध होणार असून कोणत्या विद्यार्थ्याला प्रवेशासाठी कोणते कॉलेज मिळाले याचा मेसेज प्रत्येकाच्या मोबाईलवर येणार आहे.

प्रवेशासाठी भरलेल्या अर्जाचा भाग-दोन विद्यार्थ्यांना बदलता येणार असल्याने त्यांनी सुरवातीला जरी तो भाग भरला नसला तरी त्यांना पुन्हा बदलता येणार आहे. शून्यफेरीत ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही, त्यांना पुढील फेरीपूर्वी प्रसंतिक्रम बदलता येणार आहेत. दरम्यान, प्रवेश अर्जात भरलेल्या माहितीचे एकत्रीकरण करून ८ जून रोजी शालेय शिक्षण विभागाकडून शून्यफेरी (गुणवत्ता यादी) प्रसिद्ध केली जाणार आहे.

ज्या वेबसाईटवरून अर्ज केले, तेथेच ती गुणवत्ता यादी दिसेल. त्यानंतर ९ ते ११ जून या तीन दिवसांत विद्यार्थ्यांनी मूळ कागदपत्रांसह त्या कॉलेजवर जाऊन प्रवेश निश्चित करायचा आहे. पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळूनही प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना शेवटच्या फेरीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. प्रवेशासाठी कॉलेजमध्ये गेल्यावर अनुदानित व विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांनी निश्चित केलेले शुल्क भरावे लागणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील अर्जदार विद्यार्थ्यांची स्थिती

  • एकूण अर्ज नोंदणी

  • ४७,०६९

  • शुल्क भरलेले विद्यार्थी

  • ४६,३९४

  • भाग-१ लॉक केलेले

  • ४६,०४३

  • भाग-२ लॉक केलेले

  • ४३,६३१

अर्ज न भरलेल्यांना भरता येणार अर्ज

अकरावी प्रवेश अर्ज भरण्याची मुदत संपली असली तरीदेखील जे विद्यार्थी अर्ज भरायचे राहिले आहेत, त्यांना अर्ज भरण्याची संधी मिळणार आहे. पण, प्रत्येक प्रवेश फेरीनंतर ही सुविधा उपलब्ध असणार आहे. याशिवाय ज्या विद्यार्थ्यांनी अर्जाचा पहिलाच भाग भरला, त्यांना पार्ट-२ भरता येणार आहे. तसेच पसंतीक्रम देखील विद्यार्थ्यांना प्रवेशफेरीपूर्वी बदलता येतील, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे प्रभारी संचालक श्रीराम पानझडे यांनी सांगितले. एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, अशी व्यवस्था ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत करण्यात आल्याचेही ते म्हणाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.