Sarkarnama Headlines : इंदिरा गांधींकडून स्वतःलाच भारतरत्न जाहीर, मोदी सर्वपक्षीय शिष्टमंडळातील सदस्यांशी साधणार संवाद; वाचा दुपारपर्यंतच्या महत्वाच्या घडामोडी...
Sarkarnama June 03, 2025 11:45 AM
PM Narendra Modi : सर्वपक्षीय शिष्टमंडळाशी संवाद

ऑपरेशन सिंदूरनंतर भारताकडून जगभरातील ३० हून अधिक देशांमध्ये सात शिष्टमंडळे पाठविण्यात आली आहेत. या सर्वपक्षीय शिष्टमंडळांकडून जगभरात दहशतवादाविरोधातील भूमिका मांडली जात आहे. त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. ही शिष्टमंडळे लवकरच भारतात परतणार असून त्यानंतर सर्व सदस्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधणार आहे. येत्या ९ किंवा १० जून रोजी हा संवाद आयोजित केला जाणार असल्याचे समजते.

Atul Bhatkharkar News : भातखळकरांकडून टीका

ऑपरेशन सिंदूरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वस्तुती करू नये, अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी केली होती. त्याला भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी सोशल मीडियातून प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, १९७१ च्या बांगलादेश मुक्ती संग्रामात पाकिस्तान विरुद्ध भारताला विजय मिळाल्याबरोबर, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी स्वतःच स्वतःला "भारत रत्न" पुरस्कार जाहीर केला... ही कोणत्या दर्जाची स्तुती होती. हे काँग्रेसच्या नामधारी आणि कामचलाऊ अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी स्पष्ट करावे. नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी तोंड उघडावे, अशी टीका भातखळकरांनी केली आहे.

Ranjeet Kasale News : पुन्हा तुरुंगात रवानगी

निलंबित पोलिस अधिकारी रणजित कासले यांची पुन्हा तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांना काल दिल्लीतून अटक केली होती. आज त्यांना मुंबईतील किल्ला कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्यांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दोन समाजात तेढ निर्माण करणे आणि राजकीय नेत्यांवर केलेल्या आरोपांमध्ये कासलेला अटक करण्यात आली आहे.

Mumbai Rain update : आशिष शेलार सक्रीय

मुंबई उपनगर पालकमंत्री म्हणून आशिष शेलार यांनी सोमवारी मेट्रो संबंधित मान्सूनपूर्व कामांच्या आढाव्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) कार्यालयात जाऊन बैठक घेतली. विशेष म्हणजे मुंबईत काही दिवसांपूर्वीच मान्सून दाखल झाला आहे. बैठकीत एमएमआरडीए आणि मेट्रोची सर्व प्राधिकरणे यांनी आपापसातील समन्वयासह मुंबई महानगरपालिका प्रशासनासोबत देखील समन्वय साधून काम करा तसेच दोषारोप न करता एक टीम म्हणून मान्सूनपूर्व व्यवस्थापन करा, गर्दीच्या मेट्रो स्टेशनसाठी पावसाळी आपत्कालीन प्लॅन तयार करा असे निर्देश शेलारांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पावसामुळे काही मेट्रो स्थानकांमध्ये मोठ्या प्रमाणात गळती झाली होती. त्यावरून आमदार आदित्य ठाकरेंसह महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी जोरदार हल्ला चढवला होता.

Ravi Verma News : कोठडीत रवानगी

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या रवी वर्माच्या मुसक्या एटीएसने आवळल्या आहेत. त्याला आज ठाणे कोर्टासमोर हजर करण्यात आले. कोर्टाने त्याला ५ जूनपर्यंत कोठडी सुनावली आहे. वर्मा हा इंजिनिअर असून त्याने भारताच्या युध्दनौका आणि पाणबुड्यांची माहिती पाकिस्तानला पुरविल्याचा आरोप आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.