आशा नेगी - लेखिका, कॅन्सर जनजागृतीसाठी कार्यरत
कर्करोगावर मात करणं हे केवळ शरीराशी झगडणं नाही, तर शरीर आणि मनाच्या खोल संघर्षाची एक न संपणारी मालिका असते. केमोथेरपी संपली, रिपोर्ट नॉर्मल आले... सगळ्यांना वाटतं, ‘‘आता तर एकदम मस्त! हसत-खेळत जगायचं फक्त!’’ पण जे या प्रवासातून गेलेत, त्यांना माहिती असतं, की ही सुरुवात असते ‘सर्वायव्हरशिप’ची.
शरीरावरचे परिणाम लगेच संपत नाहीत. थकवा, अंगदुखी, झोप न लागणं, केस गेलेले हे सगळं वेळ घेऊनच पूर्ववत होतं. काही वेळा केस येतात; पण आत्मविश्वास मात्र अधूनमधून हरवतो. आणि मनाचं काय? भीती, चिंता, ‘परत तर नाही ना येणार?’ हे विचार डोक्यातून जातच नाहीत. म्हणजे, फिजिकल उपचार जरी झाले तरी मेंटल हीलिंग फार महत्त्वाचं असतं. आणि हे सगळं करत असतानाच समाजाकडून येणाऱ्या प्रतिक्रिया... ‘बिचारी’, ‘तुझ्याच नशिबी का हे?’, ‘तू काम पुन्हा कसं करणार?’ - हे प्रश्न पुन्हा एक वेगळं दडपण देतात.
आणखी एक मुद्दा म्हणजे नॉर्मल आयुष्यात परत जाणं, घर, नोकरी, मैत्री, सगळं जसंच्या तसं परत जमतंच असं नाही. लोक समजून घेत नाहीत, काहीजण टाळतातही; पण यातूनही बऱ्याचजणींनी स्वतःला नव्याने शोधलंय. कुणी पुस्तक लिहिलं, कुणी योग शिकवलं, कुणी कर्करोगाबद्दल जनजागृती सुरू केली.
सर्वायव्हरशिप म्हणजे केवळ जिवंत राहणं नाही, तर अर्थपूर्ण आयुष्य जगणं. रोजच्या लहानसहान गोष्टींची मजा घेणं, स्वतःला स्वीकारणं, स्वतःवर प्रेम करणं. हे सगळं सहज वाटतं; पण यासाठी मानसिक आधार, कुटुंबाची साथ आणि योग्य मार्गदर्शन यांची फार गरज असते.
म्हणूनच सांगावंसं वाटतं, की कर्करोग संपला, पण संघर्ष नाही. पण या संघर्षात आपण एकटे नाही आहोत. अनेकांनी ही लढाई लढलीय आणि जिंकलीय. मी जिंकलं. तूही जिंकशील.
कधीकधी, आपण स्वतःच विचारतो, ‘‘मी आता खरंच ठीक आहे का?’’ शरीर बरे होतेय; पण मन अजूनही त्या हॉस्पिटलच्या स्मृतींमध्ये अडकलेलं असतं. सलाईन, तपासण्या, डोळ्यांमध्ये आलेलं पाणी हे विसरायला वेळ लागतो. कधी कधी ‘परत येईल का?’ ही शंका डोकं वर काढते. म्हणून ‘सर्व्हायवरशिप'' म्हणजे दिवसेंदिवस स्वतःला सांगणं, ‘मी ठीक आहे, मी पुरेशी आहे.’
मला आठवतं, कर्करोग जनजागृतीसंदर्भात काम करताना एकदा काउन्सलिंगसाठी एक महिला माझ्याकडे आली. तिने मला सांगितलं, ‘‘उपचार संपल्यानंतर सगळ्यांनी ‘पार्टी कर’ असं म्हटलं; पण मला शांत बसून आईच्या मांडीवर डोकं ठेवून रडायचं होतं.’’
हाच क्षण ‘सर्व्हायव्हर’ असण्याचा. बाहेरून हसणं आणि आतून स्वतःला सावरत राहणं.
मग यातून बाहेर कसं यायचं?तिला मी म्हणलं, ‘‘तुला जसं वाटतं तसं वाग... तुला आनंद वाटेल ते कर... जसं मी माझ्या कॅन्सर जर्नीवर ‘ब्युटी ऑफ लाइफ’ पुस्तक लिहून कॅन्सर जनजागृतीला सुरुवात केली.. तसेच तुला जे वाटेल ते कर... शेवटी आयुष्यात आनंद महत्त्वाचा.’’
नियमित तपासण्या हे फक्त शरीरासाठी नाही, तर मनाला सांगण्यासाठीसुद्धा असतं, की आपण काळजी घेतोय. लोकांच्या नजरेतून नव्हे, स्वतःच्या नजरांनी स्वतःकडे बघा. कुठेच ‘परफेक्ट’ नाहीय; पण हेच आयुष्य खरं आहे.
शेवटी आहे त्या परिस्थितीत स्वतःला स्वीकारणं महत्त्वाचं.
समाजाची भूमिकासमाजानं सहानुभूतीपेक्षा समजूतदारपणा दाखवायला हवा. ‘अरे आता ठीक आहेस ना?’, एवढ्यावर थांबू नका. ‘काही हवं का?’ असं विचारणं आणि नुसतं ऐकून घेणंही फार मोठा आधार असतो. लढाई संपलेली नसते; पण ती झगडण्याची पद्धत बदललेली असते.
एकेकाळी शरीरासाठी लढत होतो, आता आत्मविश्वासासाठी. पण त्या दोन्ही लढायांमध्ये मी मीच आहे. म्हणूनच ही कहाणी महत्त्वाची आहे, की उपचारानंतरही संघर्ष असतो; पण त्याला उजेड असतो... आशेचा.