दिल्लीच्या प्रसिद्ध टॅटू आर्टिस्टची अकोल्यात निर्घृण हत्या; प्रेम अन् कामासाठी दिल्लीवरून गाठल
Marathi June 03, 2025 02:25 PM

अकोला : दिल्लीची रहिवासी असलेल्या 26 वर्षीय प्रसिद्ध टॅटू आर्टिस्ट शांतीक्रिया प्रशांत कश्यप (वय 26) हिची अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे हत्या झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली होती. तब्बल 11 महिन्यांनंतर या प्रकरणातील मारेकरी चेतन महादेव शृंगारे याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. शांतीक्रिया आणि चेतनची ओळख सोशल मीडियावर झाली होती. चेतनने तिला कामाच्या आमिषाने मूर्तिजापुरला बोलावले होते. काही दिवस ते दोघे प्रतिक नगरमधील एका खोलीत एकत्र राहत होते. 23 जुलै 2024 रोजी रात्री उशिरा दोघांमध्ये वाद झाला आणि रागाच्या भरात चेतनने शांतीक्रियाच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या केली. घटनास्थळीच तिचा मृत्यू झाला.

हत्येनंतर चेतन फरार झाला होता. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू ठेवला. अखेर पोलिसांना त्याचा शोध मुंबईतील सांताक्रूझ परिसरात लागला. स्थानिक पोलिसांच्या मदतीने मूर्तिजापुर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

नेमकी कशासाठी शांतीक्रियाची हत्या?

शांतीक्रिया प्रशांत कश्यप (वय 26) आणि चेतन शृंगारे या दोघांची सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री झाली होती. चेतनने काम देतो म्हणून शांतीक्रियाला अकोल्यातल्या मूर्तिजापुर शहरात बोलावून घेतलं होतं. त्यानंतर दोघे सोबत राहू लागले होते. मात्र, 23 जुलै 2024 रोजी रात्री उशिरा दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला, अन् रागाच्या भरात चेतनने तिच्या डोक्यावर धारदार शस्त्रानं वार केले. यात तरूणीचा मृत्यू झाला होता. दरम्यान मृत शांतिक्रिया ही प्रसिद्द टॅटू आर्टिस्ट होती.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, चेतन आणि शांतीक्रिया यांच्यात प्रेमसंबंध होते. एकदा मुंबईत शांतीक्रियाच्या सांगण्यावरून चेतनला तिच्या मित्रांनी मारहाण केली होती. त्यानंतर त्यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. शिवाय, शांतीक्रिया‌ चेतनला वारंवार शिवीगाळ करायची. त्यामुळे चेतनच्या मनात राग साचत गेला आणि अखेर तो एका रात्री जीवघेण्या टोकाला पोहोचला. शांतिक्रीया 21 जुलै 2024 रोजी मुर्तीजापुर शहरात आली होती. त्यावेळी चेतन तिला घेऊन वैशाली वाईन बारमध्ये काम मागण्यासाठी गेला होता. मात्र, बार मालकानं काम द्यायला स्पष्ट नकार दिला, त्यानंतर दोघेही तिथून परतले होते. विशेष म्हणजे चेतन पाच ते सहा महिन्यांपूर्वी याच बारमध्ये वेटरचं काम करत होता. त्यानंतर दोघेही मूर्तिजापूरातील प्रतिक नगरमध्ये खोली घेवून राहत होते. चेतनला दारू पिण्याचं व्यसन होतं. हत्येच्या घटनेपासून चेतन फरार होता.

मुर्तीजापुर पोलिसांनी अखेर लावला शोध

मारेकरी चेतन हा यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील हरसूल गावातील रहिवासी आहे. तो सात वर्षांपासून गावात राहत नसल्याची माहिती मिळाली होती. आरोपीबाबत कुठलीही माहिती मिळत नव्हती. त्यामुळे तांत्रिक माहितीच्या आधारावर व मिळालेल्या माहितीच्या आधारे मूर्तिजापूर शहर पोलिसांच्या पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे यांच्या नेतृत्वातील ‘टीम’ने मुंबई येथे जाऊन त्याचा पोलिस स्टेशन सांताक्रुझच्या हद्दीत स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोध घेतला अन अटक करण्यात अखेर यश आलं. या आरोपीस ताब्यात घेऊन त्यास गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. तब्बल 11 महिन्यानंतर या आरोपीला अटक करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणातील तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.