शर्मिष्ठा पनोली प्रकरणी भाजपचे बॅनर्जींवर टीकास्त्र
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
शर्मिष्ठा पनोली या युट्यूब इन्फ्ल्युएन्सरला ‘विशिष्ट’ समाजाच्या धार्मिक भावना दुखाविल्याच्या आरोपाखाली पश्चिम बंगाल सरकारने अटक केली आहे. राज्य सरकारच्या कृतीवर भारतीय जनता पक्षाने कठोर टीका केली असून ममता बॅनर्जी हिंदूंविरोधात पक्षपात करीत असल्याचा आरोप या पक्षाने केला आहे. विशिष्ट समाजाचे नेते हिंदूंच्या विरोधात प्रक्षोभक घोषणा देतात. मात्र, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. पण एका हिंदू युट्युबर महिलेने सत्य परिस्थिती मांडली तर तिच्याविरोधात कारवाई केली जाते, असा आरोप या पक्षाच्या नेत्यांनी केला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या खासदार कंगना राणावत यांनी ममता बॅनर्जींना परखड बोल सुनावले आहेत. पश्चिम बंगाल राज्याचा उत्तर कोरिया करु नका. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे भारताच्या राज्य घटनेने सुनिश्चित केले आहे. पश्चिम बंगालमध्ये घटनेची पायमल्ली होत आहे. राज्यात हिंदू आणि मुस्लीमांसाठी दोन वेगळे कायदे आहेत, असे दिसून येते, अशी टीका कंगना राणावर यांनी सोमवारी केली.
वकील संघटनेचा पाठिंबा
पश्चिम बंगालच्या वकील संघटनेने शर्मिष्ठा पनोली यांना आपले समर्थन घोषित केले आहे. प्रत्येक राष्ट्रवादी व्यक्तीने, मग ती कोणत्याही धर्माची असो, तिने पनोली यांच्या बाजूने उभे राहण्याची आवश्यकता आहे, असे वकील संघटनेने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्या अग्निमित्रा पॉल यांनी यासाठी वकील संघटनेचे आभार मानले. पश्चिम बंगालमध्ये अलिकडच्या काळात विशिष्ट धर्माचा धर्मवाद वाढीला लागला असून सोशल मिडियावर भारताच्या विरोधात गरळ ओकली जात आहे. हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अपमान केला जात आहे. पश्चिम बंगाल आणि साऱ्या भारताचे दैवत असणाऱ्या माता कालीचाही अपमान केला जात आहे. तरीही अशा लोकांविरोधात कोणतीही कारवाई केली जात नाही. मात्र, हिंदूंनी या संदर्भात सत्यस्थिती मांडली, तर मात्र त्यांना गजाआड केले जाते. अल्पसंख्याकांच्या मतांवर डोळा ठेवून अशा प्रकारे हिंदूंवर अन्याय केला जात असून ममता बॅनर्जी यांना विधानसभा निवडणुकीत या पक्षपाताची जबर किंमत मोजावी लागेल, असा इशाराही पॉल यांनी दिला. पनोली यांनी अटक केल्यामुळे राज्यातील तृणमूल काँग्रेस सरकारविरोधात सर्वसामान्य हिंदू जनताही नाराज झाली असल्याचे दिसून येत आहे.
अनेक उदाहरणे
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा अनेकदा हिंदू देवदेवतांचा जाहीर अपमान करतात. मुर्शिदाबाद येथील दंगल तृणमूल काँग्रेसच्याच नेत्यांनी घडविली आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मात्र असे असूनही राज्य सरकारने कोणतीही कारवाई केली नाही. ममता बॅनर्जी हिंदूंना कवडीइतकी किंमतही देत नाहीत, असा घणाघात अग्निमित्रा पॉल यांनी त्यांच्या वक्तव्यात केला आहे.