Ahilyanagar Crime : गोळीबाराने जिल्हा हादरला! 'जामखेडसह शहरातही झाडल्या पिस्तुलातून गोळ्या'; राग अनावर झाला अन्..
esakal June 03, 2025 08:45 PM

अहिल्यानगर : शहरासह जिल्ह्यातील जामखेड येथे पिस्तुलातून गोळीबार केल्याच्या लागोपाठ दोन घटना घडल्या आहेत. त्यात एकजण गंभीर जखमी झाला आहे. या गोळीबाराने जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. यापूर्वी देखील गोळीबाराचे अनेक प्रकार घडले आहेत. असे असताना पोलिस प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. वारंवार घडणाऱ्या या गोळीबारामुळे जिल्ह्याची वाटचाल ‘गँगवार’च्या दिशेने सुरू असल्याचे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे बघ्याची भूमिका सोडून पोलिसांना ठोस कारवाई करावी लागणार आहे; अन्यथा गोळीबारासह खुनाचे सत्र सुरू होण्यासही वेळ लागणार नाही.

येथे महिला आहेत, त्यामुळे येथे लघुशंका करू नका, असे सांगितल्याचा राग आल्याने जामखेड रस्त्यावरील पोकळे वस्ती येथे एकाने पिस्तुलातून तीन गोळ्या झाडल्या. दोन गोळ्या हुकल्या, परंतु एक गोळी कुणाल बंडू पवार (रा. पोकळेवस्ती, जामखेड) याच्या पायाला लागली. त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. हा प्रकार रविवारी पोकळे वस्ती येथे घडला. या प्रकरणी आदित्य बबन पोकळे (वय २०, रा. पोकळेवस्ती, जामखेड) यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोळीबार करणाऱ्या सहा आरोपींना ताब्यात घेतले. या घटनेनंतर अहिल्यानगर शहरातील तपोवन रोडवर मध्यरात्रीच्या सुमारास एका २४ वर्षीय तरुणावर गोळीबार करण्यात आला. ‘तू ऋषी ढवण याच्यासोबत का राहतोस? असे म्हणत मारहाण करून तरुणाच्या दिशेने पिस्तुलातून गोळीबार करून खुनाचा प्रयत्न केला. याप्रकरणी प्रमोद रामदास घोडके (वय २४, रा. दत्त मंदिराशेजारी, ढवण वस्ती, तपोवन रोड) यांच्या फिर्यादीवरून ५ जणांच्या विरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

शहर गोळीबारातील आरोपी

फिर्यादी प्रमोद रामदास घोडके (वय २४, रा. दत्त मंदिराशेजारी, ढवण वस्ती, तपोवन रोड) याला आरोपींनी राजवाडा हॉटेलजवळ बोलवून घेतले. ‘तू ऋषी ढवन बरोबर का राहतोस त्याच्याबरोबर राहू नकोस, असे म्हणून आकाश नसाणे याने शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यावेळी राहुल सांगळे व भीमराज आव्हाड हे तेथे आले. भीमराव आव्हाड याने त्याच्या हातातील पिस्तुलाने फिर्यादीच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. पण नेम चुकल्याने कोणालाही गोळी लागली नाही. तोफखाना पोलिसांनी भीमराज आव्हाड, राहुल सांगळे, राजवाडा हॉटेलचे मालक मयूर फणसे, तेथे काम करणारा कुणाल मराठे, आकाश नसाणे यांच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.

जामखेड गोळीबारातील ताब्यातील आरोपी

प्रभू रायभान भालेकर (वय ३३, रा. निपाणी, छत्रपती संभाजीनगर), नकुल विष्णू मुळे (वय ४०, रा. खेर्डा, ता. , छत्रपती संभाजीनगर), शरद अंकुशराव शिंदे (वय ३८, रा. पुसेगाव, ता. पैठण, छत्रपती संभाजीनगर), गणेश गोविंद आरगडे (वय ३०, रा. खंडाळा, ता. पैठण, छत्रपती संभाजीनगर), रावबहादूर श्रीधर हारकळ (वय ३५, रा. सारासिध्दी सोसायटी, बीड बायपास, छत्रपती संभाजीनगर) व सुशील ताराचंद गांगवे (वय ३०, रा. पद्मपुरा, छत्रपती संभाजीनगर)

जिल्हा टोळी युद्धाच्या दिशेने

या दोन्ही गोळीबारांच्या घटनेने जिल्हा हादरून गेला आहे. या निमित्ताने शहर व जिल्ह्यातील गावठी पिस्तुलांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात असेच गोळीबाराचे सत्र सुरू झाले होते. त्यात काहींचा जीव देखील गेलेला आहे. हा गोळीबार केवळ टोळी युद्धाच्या कारणातून झाल्याचे यापूर्वी देखील तपासात समोर आलेले आहे. त्यामुळे या टोळ्यांना कोण पोसत आहे, या गुन्हेगारांना कायद्याचा काही धाक आहे की नाही? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. हा गोळीबार थांबला नाही, तर जिल्ह्यात पुन्हा टोळीयुद्ध सुरू होण्याची भीती देखील नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.