रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची गेल्या 17 वर्षांमध्ये नेटकऱ्यांकडून आणि इतर संघाच्या चाहत्यांकडून हेटाळणी करण्यात आली. आरसीबी आयपीएल ट्रॉफी केव्हा जिंकणार? असे आणि अनेक प्रश्न करुन चाहत्यांना नको नको ते सुनावलं. मात्र त्यानंतरही एकनिष्ठ चाहत्यांनी आरसीबीवर विश्वास कायम ठेवला. आरसीबी टीमनेही चाहत्यांचा विश्वास खरा ठरवला आणि 18 वर्षांची प्रतिक्षा संपवत आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरत इतिहास घडवला. आरसीबीने आयपीएल 2025 फायनलमध्ये पंजाब किंग्सवर 6 धावांनी मात करत पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली. जे इतर कर्णधारांना जमलं नाही ते रजत पाटीदार याने पहिल्याच हंगामात करुन दाखवलं. रजत पाटीदार याच्या नेतृत्वात आरसीबीने ही कामगिरी केली. रजतने या ऐतिहासिक विजयानंतर काय म्हटलं? हे जाणून घेऊयात.
“मला वाटतं की हा विजय माझ्यासाठी, विराट कोहली आणि वर्षानुवर्षे पाठींबा देणाऱ्या सर्व चाहत्यांसाठी खूप खास आहे. ते त्यासाठी पात्र आहेत. क्वालिफायर 1 मॅचनंतर आपण जिंकू शकतं वाटलं. मला वाटतं की या ट्रॅकवर 190 धावा हा चांगला स्कोअर होता. गोलंदाजांनी ज्या पद्धतीने त्यांच्या योजना राबवल्या ते पाहणं जबरदस्त होतं. कृणाल पंड्या विकेट्स घेणारा बॉलर आहे. मी जेव्हा जेव्हा दबावात येतो तेव्हा मी केपीकडे (कृणाल पंड्या) पाहतो. सुयशनेही संपूर्ण हंगामात खूप चांगली गोलंदाजी केली”, असं म्हणत रजतने फिरकी जोडीचं कौतुक केलं. कृणालने अंतिम सामन्यात निर्णायक क्षणी 2 विकेट्स घेतल्या. तसेच रजतने वेगवान गोलंदाजांचं नाव घेत त्यांना श्रेय दिलं.
“भुवनेश्वर कुमार, यश दयाल, जोश हेझलवूड आणि रोमारियो शेफर्ड. रोमरियो ज्या पद्धतीने आला आणि त्याने 2-3 ओव्हर टाकून ब्रेकथ्रू दिला ते खास होतं”, असंही रजतने म्हटलं. रोमरियोने पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर याला त्याच्या डावातील दुसर्याच बॉलवर आऊट करत आरसीबीच्या विजयातील सर्वात मोठा अडथळा दूर केला.
“टीम मॅनेजमेंट, सपोर्ट स्टाफ आणि खेळाडूंना ज्या पद्धतीने पाठिंबा दिला आहे ते सर्व सुंदर होतं”, असं म्हणत रजतने चाहत्यांचे आभार मानले. तसेच जाता जाता रजतने आरसीबीचे चाहते जे एक वाक्य ऐकण्यासाठी आसुसले होते, ते वाक्य रजतने बोलून दाखलं. “ई साला कप नामदू”
पंजाबने टॉस जिंकला. कर्णधार श्रेयसने फिल्डिंगचा निर्णय घेतला. आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 190 धावा केल्या. विराट कोहली याने सर्वाधिक 43 धावांचं योगदान दिलं. तर पंजाबसाठी अर्शदीप सिंह आणि कायले जेमिन्सन या दोघांनी प्रत्येकी 3 विकेट्स मिळवल्या. पंजाबला 191 धावांचं पाठलाग करताना 184 पर्यंतच पोहचता आलं. आरसीबीने अशापक्रारे चौथ्या प्रयत्नात आयपीएल ट्रॉफी जिंकण्यात यश मिळवलं.