चिपळूण-वाशिष्ठीच्या किनारी २७५ मीटरची पूर संरक्षक भिंत
esakal June 04, 2025 04:45 AM

-rat३p१४.jpg-
२५N६७८७१
चिपळूण ः शहरातील शंकरवाडी येथील नलावडे बंधाऱ्याचे काम अखेर पूर्ण झाले आहे.
----
वाशिष्ठी किनारी २७५ मीटरची पूर संरक्षक भिंत
नलावडे बंधारा सज्ज ; सहा महिन्यात झाले काम पूर्ण
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३ ः दरवर्षी पावसाळ्यात शहराला महापूर व अतिवृष्टीत दुथडी भरून वाहणाऱ्या वाशिष्ठी नदीच्या प्रवाहाला रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गाळ उपशासह नलावडे बंधारा उभारण्यात आला असून, अपेक्षित मुदतीच्या पंधरा दिवस आधीच व अवघ्या सहा महिन्याच्या कालावधीत हे काम पूर्ण झाले आहे. वाशिष्ठी किनारी २७५ मीटर लांबी व १२ मीटर उंचीची ही भिंत आहे.
वाशिष्ठी व शिवनदीच्या काठावर चिपळूण शहर वसले आहे. त्यामुळे पावसाळ्यात अतिवृष्टीवेळी दरवर्षी येथे महापूर किंवा पुरसदृश स्थिती निर्माण होते. या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. सलग दोन वर्षे गाळ उपसा केला जात आहे त्याशिवाय शहरात पूररेषेच्या आत बांधकामांवर नियंत्रित आणले आहे. त्यानंतर आता पुराची तीव्रता कमी करण्यासाठी नलावडे बंधारा उभारण्यात आला आहे. हा बंधारा चिपळूणच्या महापुरावर नियंत्रण आणण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून तितकाच फायदेशीर ठरणार आहे.
शहरामध्ये शंकरवाडी-मुरादपूर या दोन वाड्यांमध्ये कमी उंचीचा सखल भाग आहे. या नदीच्या वळणावर संरक्षक भिंतीचे (नलावडे बंधारा) जुने दगडी बांधकाम पूर्ण केलेले होते; परंतु २००५च्या पुरामुळे बंधाऱ्याचे बांधकाम वाहून गेले. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात पुराचे पाणी शिरून वित्तहानी होत आहे. २०२१च्या महापुरातही मोठा फटका या भागासह शहराला बसला. यामुळे या ठिकाणी पूरसंरक्षक भिंत उभारली जावी, अशी मागणी चिपळूण बचाव समितीसह स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधी यांच्याकडून सातत्याने होत होती. त्या मागणीची दखल घेत आमदार शेखर निकम यांनी पावसाळ्यापूर्वी येथील संरक्षक भिंत उभारणीसाठी २० कोटी २१ लाख १९ हजार ३०० रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. हे काम सहा महिन्यात पूर्ण केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.