रजत पाटीदार याच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल ट्रॉफी जिंकली आणि 18 वर्षांची प्रतिक्षा अखेर संपवली. रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयपीएल 2025 चा महाअंतिम सामना खेळवण्यात आला. पंजाबला या सामन्यात 191 धावांचा पाठलाग करताना 184 धावांपर्यंतच पोहचता आलं. शशांक सिंह याने पंजाबला जिंकवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र शशांकचे प्रयत्न अपुरे ठरले. पंजाबला 20 ओव्हरमध्ये 184 धावांपर्यंतच पोहचता आलं. आरसीबीने अशाप्रकारे महाअंतिम सामना 6 धावांनी जिंकला आणि आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं. पंजाबसाठी शंशाकने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. शशांकने 30 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 3 फोरसह नॉट आऊट 61 रन्स केल्या.
आरसीबीच्या या विजयामुळे विराट कोहलीला, टीममधील सर्व खेळाडूंना, सपोर्ट स्टाफला आणि चाहत्यांना आनंद झाला. इतकंच नाही तर, आरसीबीचे माजी मालक विजय मल्ल्या यांनाही आनंद झाला. आरसीबीच्या विजयामुळे विजय मल्ल्यांचं स्वप्नही पूर्ण झालं. आरसीबीच्या या विजयानंतर विजय मल्ल्या यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन पोस्ट केली. मल्ल्यांनी या पोस्टमध्ये ख्रिस गेल, एबी डीव्हीलियर्स आणि विराट कोहली या तिघांची नावं घेतली. मल्ल्या विराट कोहली याच्याबाबत काय म्हणाले? हे जाणून घेऊयात.
“मी जेव्हा आरसीबीची स्थापना केली तेव्हा आयपीएल ट्रॉफी बंगळुरूला यावी, असं माझं स्वप्न होतं. मला तरुणपणी महान किंग कोहलीची निवड करण्याचे सौभाग्य मिळाले. तो 18 वर्षे आरसीबीसोबत राहिला हे उल्लेखनीय आहे. ‘युनिव्हर्स बॉस’ ख्रिस गेल आणि आरसीबीच्या इतिहासाचा अविभाज्य भाग राहिलेल्या ‘मिस्टर 360’ एबी डिव्हीलयर्स याची निवड करण्याचा मानही मला मिळाला”, असं म्हणत मल्ल्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच आरसीबीच्या विजयाबाबत प्रतिक्रिया दिली.
विजय मल्ल्या यांची एक्स पोस्ट
“शेवटी आयपीएल ट्रॉफी बंगळुरूमध्ये आली. माझे स्वप्न साकार करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन आणि पुन्हा एकदा आभार. आरसीबीचे चाहते सर्वोत्तम आहेत. ते आयपीएल ट्रॉफीसाटी पात्र आहेत. ई साला कप बंगळुरू बरुथे!”, असं म्हणत मल्ल्यांनी चाहत्यांचे आभार मानले.