IPL RCB vs PBKS : आयपीएलच्या अंतिम सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात
BBC Marathi June 04, 2025 09:45 AM
Getty Images आयपीएलची ही ट्रॉफी आज कोण उचलणार?

तब्बल 10 आठवडे आणि 73 सामन्यांनंतर आयपीएलची लढत आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स या दोन संघांमधल्या लढतीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिमयमवर हा सामना खेळवला जातो आहे.

बंगळुरू आणि पंजाबच्या टीमनं आजवर आयपीएलचं विजेतेपद मिळवलेलं नाही. त्यामुळे आज कोणीही जिंकलं, तरी आयपीएलला नवा विजेता मिळणार हे निश्चित झालं आहे.

बंगळुरूच्या टीमनं फायनल गाठण्याची ही चौथी वेळ आहे. याआधी 2009, 2011 आणि 2016 साली ते RCB फायनलमध्ये पोहोचले होते, पण त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं.

गेल्या सहा मोसमांत बंगळुरूनं पाचवेळा प्लेऑफ गाठला आहे. आजवर हुलकावणी देणारं विजेतेपद बंगळुरू यंदा मिळवणार का, याकडे त्यांच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

दुसरीकडे पंजाब किंग्जनं सतरा वर्षांत दुसऱ्यांदाच आयपीएलची फायनल गाठली आहे. याआधी 2014 साली त्यांनी उपविजेतेपद मिळवलं होतं.

यंदा साखळी फेरीच्या अखेरीस गुणतालिकेत पंजाबनं पहिलं स्थान मिळवलं होतं. त्यामुळे फायनलमध्येही त्यांचं पारडं बंगळुरूच्या तोडीस तोड मानलं जातंय.

BBC

BBC

आजचा हा सामना म्हणजे विराट कोहली आणि श्रेयस अय्यर या दिग्गजांमधली चुरस मानली जाते आहे.

बंगळुरूच्या संघाचं नेतृत्व रजत पाटीदारच्या हाती असलं, तरी विराटच त्यांचा सर्वात मोठा स्टार खेळाडू आहे.

पण 18 नंबरची जर्सी घालून तब्बल 18 वर्षं खेळणाऱ्या विराटला आजवर आयपीएलचं विजेतेपद मिळवता आलेलं नाही.

तर दुसऱ्या बाजूला श्रेयस अय्यरने सलग दुसऱ्या वर्षी दोन वेगवेगळ्या संघांना आयपीएलच्या अंतिम फेरीत घेऊन येण्याची किमया साधली आहे.

मागच्या वर्षी श्रेयसने कोलकाता नाईट रायडर्सचं यशस्वी नेतृत्व केलं होतं. पण त्यानंतर झालेल्या लिलावात पंजाब किंग्सने श्रेयसवर यशस्वी बोली लावली आणि श्रेयसनं पंजाबला फायनलमध्ये नेत तो विश्वास सार्थ ठरवला आहे.

Getty Images श्रेयस अय्यर आणि विराट कोहली

बंगळुरू आणि पंजाब यांच्यामध्ये 2008 पासून आतापर्यंत झालेल्या 36 सामन्यांमध्ये 18 पंजाबने जिंकले आहेत तर 18 सामन्यांमध्ये बंगळुरू विजयी झाली आहे.

यावर्षी झालेल्या तीन सामन्यांमध्ये बंगळुरूने 2 तर पंजाबने 1 सामना जिंकला आहे. दोन्ही संघांनी विरुद्ध संघाच्या घरच्या मैदानावर विजय मिळवले आहेत हे विशेष.

क्वालिफायर-1 मध्ये पंजाबच्या फलंदाजांनी बंगळुरूच्या गोलंदाजीसमोर अक्षरशः नांगी टाकली होती.

मात्र, अंतिम सामन्यात हे दोन्ही संघ आजवरचा प्रवास विसरून, आजवर आलेलं अपयश विसरून यावर्षीचा आयपीएल चषक त्यांच्या नावे करण्यासाठी प्राणपणाने झुंजतील यात कसलीही शंका नाही.

Getty Images नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद

अहमदाबादच्या मैदानावर यावर्षी धावांची बरसात झाली आहे. या मैदानावर झालेल्या आठ सामन्यांमध्ये तब्बल अकरावेळा 200 ची धावसंख्या ओलांडली गेली आहे आणि एका डावात 196 धावा काढण्यात आल्या आहेत.

पंजाबने याआधी इथे दोन सामने खेळले आहेत. साखळी फेरीत खेळलेल्या सामन्यात त्यांनी 243 धावांचा डोंगर उभा केला होता. या मैदानावर बंगळुरूचा हा पहिलाच सामना असेल.

पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघांनी इथे झालेल्या आठपैकी 6 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. रात्री खेळवण्यात आलेल्या एकाच सामन्यात धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला आहे आणि तो सामना म्हणजे क्वालिफायर-2.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.