Thackeray claims that Amit Shah gave advice to BJP MLAs
Marathi June 06, 2025 06:25 AM


अजित पवार यांना आवरा, असे गाऱ्हाणे घेऊन भाजपा आमदार अमित शहा यांना भेटले. त्यावर ‘त्यांच्या इतके मागे लागा की, अजित पवारच माझ्याकडे तक्रार घेऊन आले पाहिजेत’, असा डबल इंजिन सरकारचा आदर्श कानमंत्र अमित शहा यांनी आपल्या आमदारांना दिला.

मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील शिंदे गट अर्थखात्यावर म्हणजेच अजित पवार यांच्यावर नाराज आहे. मध्यंतरी भाजपा आमदारांनीही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन अर्थमंत्री अजित पवार यांच्याविरुद्ध तक्रारी केल्या होत्या. अजित पवार यांना आवरा, असे गाऱ्हाणे घेऊन भाजपा आमदार अमित शहा यांना भेटले. त्यावर ‘त्यांच्या इतके मागे लागा की, अजित पवारच माझ्याकडे तक्रार घेऊन आले पाहिजेत’, असा डबल इंजिन सरकारचा आदर्श कानमंत्र अमित शहा यांनी आपल्या आमदारांना दिला. महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्ये हे असे मनोरंजक महानाट्य सुरू आहे, अशी कुत्सित टिप्पणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. (Ajit Pawar Vs BJP: Thackeray claims that Amit Shah gave advice to BJP MLAs)

एकूण 132 आमदार असलेल्या भाजपाला तसेच अमित शहा यांनी स्थापन केलेल्या मिंधे पक्षालाही अजित पवार जेरीस आणत असतील तर या सरकारमध्ये केवळ अजित पवारच खुश आहेत आणि अजितदादांचे हे मोठेच कौशल्य आहे असे म्हणावे लागेल, असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील फडणवीस, मिंधे, अजितदादा यांच्या महायुती सरकारमध्ये सध्या जोरदार नाराजीनाट्य रंगले आहे. पाशवी बहुमत असलेल्या सरकारमधील या लाथाळ्या, आरोप-प्रत्यारोप आणि रुसवे-फुगवे पाहून महाराष्ट्राच्या जनतेची फुकटात करमणूक होत आहे. महायुती सरकारमधील ही सुंदोपसुंदी, कुरघोड्या आणि नाराजीनाट्य यांचा जो काही शेवट व्हायचा तो होईल, पण तोवर महाराष्ट्राच्या जनतेला तीन पक्षांचा हा तमाशा नाइलाजाने सहन करावा लागणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

सरकार कोणत्याही पक्षाचे असो, पण सरकारमधील नाराजांना मात्र कोणताही पक्ष नसतो. मिंधे मंडळ उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्येही नाराज होते आणि आता फडणवीस सरकारमध्येही त्यांची नाराजी कायम आहे. सत्ता, पदाचा लोभ, पैसा, अहंकार आणि राजकीय महत्त्वाकांक्षेत नाराजीच्या व्याधीचे मूळ दडलेले असते. नाराजीच्या या आजारावर कुठलेच औषध नाही. एकदा तो जडला की, बळावत जातो, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.