अपेक्षांचे संतुलन
esakal June 04, 2025 10:45 AM

- डॉ. सचिन जैन, संस्थापक-संचालक, एसकेवायआय कम्पोझिट प्रायव्हेट लिमिटेड

आतापर्यंत आपण स्वतःच्या सर्वांगीण विकासाठी आवश्यक कौशल्याचे महत्त्व बघितले, तितक्याच महत्त्वाचे आहे. बाहेरच्या/आजूबाजूच्या लोकांच्या अपेक्षा आणि त्यांच्याशी निगडित गोष्टींवर नियंत्रण ठेवणे. आपण आपल्याकडून, आपल्या सहकाऱ्याकडून किंवा आपल्या पाल्याकडून बऱ्याचदा अवाजवी अपेक्षा ठेवतो आणि त्या पूर्ण झाल्या नाही की, आपला भ्रमनिरास करतो.

अवास्तव अपेक्षा नको

अवास्तव अपेक्षा म्हणजे अशा अपेक्षा की, ज्या पूर्ण करण्यासाठी खूप कष्ट, मानसिक-शारीरिक आणि आर्थिक त्रागा होतो, कधी कधी तर त्या वास्तवात पूर्ण होणं शक्यच नसतं आणि समजा झाल्याच तर त्यासाठी मोजवी लागलेली किंमत जे साध्य झालं त्यापेक्षा खूपच जास्त असते.

मराठीत एक सुंदर म्हण आहे - ‘आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट’ अर्थात वेळोवेळी जर आपण आपल्या पाल्याला किंवा सहकाऱ्यांना त्यांच्या अभ्यासाबद्दल, कामाबद्दल आपले मत प्रदर्शित करून योग्य तो अभिप्राय नाही तर, त्याचा स्वतः बद्दल खोटा आत्मविश्वास वाढतो व ते अवास्तव अपेक्षा ठेवू लागतात.

याचं प्रत्यंतर असाध्य धेय, निराशा आणि तत्सम गोष्टी यात येतं. जास्त अपेक्षा ठेवणे चुकीचे नाही आणि त्या पूर्ण करण्यासाठी प्रचंड ताकद, जिद्द लावणे हेही चुकीचं नाही. त्यात काहीच वावगे नाही, पण त्या अपेक्षा चुकीच्या निकषांवर नसाव्यात.

चर्चा करा

आपला व्यवसाय वाढवा म्हणून आपण उच्चभ्रू लोंकाच्या महागड्या पार्ट्यांमधे आपण जायला लागतो. मग त्यासाठी महागडे कपडे, ऐपतीपेक्षा जास्त खर्चिक घड्याळ, बूट यावर पैसे घालवतो. या सगळ्याचा कुठे तरी स्वतःच्या आर्थिक आणि मानसिक परिस्थितीवर विपरीत परिणाम होऊ लागतो आणि मग अपयश पचवण्याची शक्तीदेखील कमी होऊ लागते.

आपला पाल्याची गुणवत्ता आणि त्याला आयुष्यात पुढे काय करायचे आहे? यासाठी थोडा वेळ काढून तिच्याशी किंवा त्याच्याशी वास्तवात राहून चर्चा करणे जास्त महत्त्वाचे असते. आजकाल सोशल मीडिया आणि इतर माध्यमांचा वापर वाढल्याने सगळ्यांना वाटते की, त्यांना पुढे काय करायचे आहे?

याचे अतिशय स्पष्ट उत्तर मिळाले आहे, पण ही सगळी मते ऐकलेल्या किंवा पाहिलेल्या गोष्टींवर अवलंबून असतात त्याला व्यवहारिक अनुभव किंवा वास्तवाचे ज्ञान कमीच असते. त्यामुळे आपल्याला वेळेवर आणि वेळोवेळी मुलांबरोबर ही चर्चा करून त्याची शैक्षणिक/ शारीरिक आणि मानसिक मर्यादा समजून घेऊन आणि त्याच्या जोडीला आपली आर्थिक परिस्थिती - जेणेकरून आपला कुटुंबावर पुढे त्याचा ताण येणार नाही याचे गणित मांडूनच निर्णय घेतला पाहिजे आणि आपल्या व पाल्यांच्या अपेक्षा ठरावल्या पाहिजेत.

उघड्या डोळ्यांनी स्वप्ने पाहा

मोठ्या अपेक्षा ठेवणे चुकीचे नाहीच मुळी! मात्र, मोठी स्वप्ने उघड्या डोळ्यांनी बघायला हवीत. याचा अर्थच असा आहे की, अपेक्षा आणि स्वप्ने मोठी ठेवा, पण त्याच्या जोडीला आपले प्रयत्न, गुणवत्ता आणि आर्थिक कुवतही असू द्या. तेही बघा. त्यानुसार निर्णय घ्या. आधीचा निर्णय चुकीचा होताना दिसत असेल, तर वेळीच त्याला योग्य दिशा देऊन नवी सुरुवात करा.

प्रत्येक क्रिकेटपटू कोहली किंवा तेंडुलकरच होणार, गाणे शिकल्यावर आपण लगेच आशा भोसले किंवा लतादीदीच होऊ असं होत नाही, ते शक्यही नाही. मात्र, प्रयत्न करणं आपलं काम आहे. काही करिअरमध्ये जसे की, चित्रकला, नाटक-सिनेमा यात यशाची टक्केवारी फार कमी आहे.

मात्र, यातील बाकी लोक अपयशी असतात असं आपण समजू नये. त्यांनाही त्यांची दिशा सापडते. यासाठी वेळीच आपल्या सहकाऱ्यांचे, मित्रांचे, सोबतच्या लोकांचे प्रामाणिक मत विचारून योग्य ते बदल करा आणि स्वतःची वाटचाल सुकर करा.

सुखाचा मंत्र

म्हणतात ना ‘सुबह का भूला अगर शाम को घर आ जाये, तो उसे भूला नहीं कहते’ याचाच अर्थ वेळेवर चूक सुधारली, तर यश मिळणारच. त्यामुळे अवास्तव अपेक्षा न ठेवता योग्य त्या अपेक्षा ठेवून - आर्थिक समतोल साधून निर्णय घेतले, तर आपले आणि आपल्यावर अवलंबून असलेल्या लोकाचे आयुष्य सुखी होईल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.