श्रीविद्या राजन यांचा जन्म केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील तत्तमंगलम नावाच्या एका छोट्या गावात झाला.श्रीविद्या राजन यांचे वडील भारतीय सैन्यात मेजर होते आणि आई शिक्षिका होती. श्रीविद्याला 4 भावंडे होती. श्रीविद्या तिच्या आई आणि भावंडांसह तिच्या वडिलांच्या पोस्टिंगच्या ठिकाणी जात असे. त्या वेळी सैन्यातील महिलांना फक्त वैद्यकीय क्षेत्रात काम करण्याची परवानगी होती आणि श्रीविद्याला त्यात रस नव्हता. मात्र तिला पायलट होण्याची इच्छा होती. त्या काळात एखाद्याला एव्हिएशन स्कूलमध्ये पाठवणे खूप खर्चीक होते. म्हणून, तिने रसायनशास्त्रात पदवी मिळवण्याचा मार्ग निवडला. पण, जेव्हा भारत सरकारने महिलांना वैमानिक होण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिने भारतीय हवाई दलात भरतीसाठी अर्ज केला.
श्रीविद्या राजनने लेखी परीक्षा उत्तीर्ण केली, परंतु दुसऱ्या स्तरावरील स्क्रीनिंगमध्ये तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ती निराश होऊन घरी परतली, पण तिने हार मानली नाही. खरं तर, ती खूप बारीक होती आणि तिचे वजन 49 किलो होते. तिने तिच्या आरोग्यावर आणि शरीरयष्टीवर लक्ष केंद्रित केले. तसेच तिने पलक्कडमधील ‘ब्रिलियंट कॉम्प्युटर्स’ नावाच्या कंपनीत शैक्षणिक सल्लागार म्हणून काम सुरु केले. या नोकरीमुळे तिचे इंग्रजी सुधारले. तिच्या मेहनतीचे चीज झाले आणि ती भारतीय हवाई दलात सामील झाली. आंध्र प्रदेशातील डुंडीगल येथील हवाई दल अकादमीमध्ये तिने प्रशिक्षण घेतले. सुरुवातीला ती खूप उत्साहित होती, पण प्रशिक्षणाचे पहिले काही महिने खूप कठीण होते. दीड वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर, जेव्हा श्रीविद्या राजन यांना कमिशन मिळाले, तेव्हा तिची पोस्टिंग जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर येथे झाली. श्रीविद्या ज्या टीममध्ये सामील झाली होती त्यात गुंजन सक्सेनासह एकूण 22 पायलट होते.
1999 मध्ये कारगिल युद्ध सुरू झाले आणि भारतीय हवाई दलाने आपली संपूर्ण ताकद तैनात केली. श्रीविद्या राजनला कारगिल युद्धाच्या ड्युटीसाठी श्रीनगरला पाठवण्यात आले. मात्र तिला या युद्धाची जाणीव नव्हती. जेव्हा तिला याबद्दल कळले तेव्हा ती खूप घाबरली. त्यावेळी, श्रीविद्या यांना कारगिल युद्ध क्षेत्रातील जखमी सैनिकांना श्रीनगर आर्मी बेस हॉस्पिटलमध्ये नेण्याचे काम देण्यात आले होते. श्रीनगरमध्ये लढाऊ विमान उडवणे श्रीविद्यासाठी आव्हानात्मक होते, परंतु जखमी सैनिकांना रुग्णालयात नेण्याचे आणि रेशन पुरवण्याचे काम तिने उत्तमरित्या पार पडले.
श्रीविद्या राजनच्या या कामगिरीमुळे भारतीय सैन्य आणि हवाई दलातील महिलांबद्दलची मानसिकता बदलण्यास मदत झाली. आता महिला वैमानिकही युद्धाशी संबंधित जबाबदार भूमिकांमध्येही आपले अढळ स्थान निर्माण करत आहेत.
हेही वाचा : World Environment Day 2025 : या लहान सवयी करतील पर्यावरणाचे रक्षण
संपादित – तनवी गुडे