Bhaskar Jadhav’s reaction on Raj Thackeray and Uddhav Thackeray coming together
Marathi June 06, 2025 08:25 AM


आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी राज्यातील निवडणुकांमधील जागा वाटपाच्या संदर्भात आपापली क्षमता बघून जागा घेण्याच्या संदर्भात निर्णय घ्यावा, असे मत मांडले.

मुंबई : राज ठाकरे यांनी युतीसाठी दिलेल्या टाळीला शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिटाळी दिली आहे. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून शिवसेना ठाकरे पक्ष आणि मनसेमध्ये अद्याप युती झालेली नाही. तर दुसरीकडे गेल्या काही काळापासून युतीबाबत दोन्ही बाजूंनी टोलवाटोलवी सुरू झाली. असे असले तरी आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी आज (05 जून) दोन्ही भावांनी एकत्र यावे आणि ठरवावे, असा सावध पवित्रा घेतला. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी मोठे विधान केले आहे. (Bhaskar Jadhav’s reaction on Raj Thackeray and Uddhav Thackeray coming together)

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भास्कर जाधव दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत भाष्य केलं आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी म्हटले की, दोन्ही भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्राप्रमाणे मलाही आनंद आहे. पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अंतिम टप्यात एकत्र यावं. त्यावेळी दोन्ही पक्षांनी विश्वासातली चार माणसे पाठवून प्रस्तावावर आधी व्यवस्थित चर्चा करावी. कारण राज ठाकरे यांच्या प्रस्तावाचे मी त्यावेळीही स्वागत केले होते. पण आता दोन भाऊ एकत्र येणार नसून दोन पक्ष एकत्र येणार आहेत. त्यामुळे राज्यातील निवडणुकांमधील जागा वाटपाच्या संदर्भात आपापली क्षमता बघून जागा घेण्याच्या संदर्भात निर्णय घ्यावा, असे मत भास्कर जाधव यांनी मांडले.

हेही वाचा – Ajit Pawar : फडणवीसांनी 120 च्या स्पीडने गाडी चालवली आणि टनेल येताच…; अजितदादांनी सांगितला प्रवासाचा अनुभव

काय म्हणाले होते अमित ठाकरे?

मनसे-ठाकरे गटाच्या युतीवर भूमिका स्पष्ट करताना अमित ठाकरे म्हणाले की, दोन्ही भाऊ एकत्र आले तर मला काही प्रॉब्लेम नाही. मात्र त्यांची म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची इच्छा असेल तर त्यांनी एकमेकांना फोन करावा. दोघांकडेही एकमेकांचा नंबर आहे. आम्ही बोलून काही फरक पडणार नाही. दोन भावांनी एकत्र यावे हे त्यांनीच ठरवावे. कारण आम्ही 2014 आणि 2017 मध्ये प्रस्ताव दिला होता, तेव्हा काय झाले? शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही थांबलो होतो. त्यांची इच्छा असेल, त्यांनी फोन करावा. हे मीडियासमोर बोलून किंवा वर्तमानपत्रात बोलून अशाप्रकारे युती होत नाही. त्यामुळे मला वाटतं की, त्या दोघांकडे एकमेकांचे नंबर आहेत, ते एकमेकांशी बोलू शकतात, अशी भूमिका अमित ठाकरे यांनी मांडली होती.

हेही वाचा – Samruddhi Mahamarg : समृद्धीच्या लोकार्पणानंतर शक्तिपीठ महामार्गाबाबत फडणवीसांचं मोठं विधान



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.