ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय भारतीय खासदारांची शिष्टमंडळ परदेश दौऱ्यांवर आहेत. विविध देशात जाऊन ही शिष्टमंडळं भारताची भूमिका मांडत आहेत. जगभरात पाकिस्तानची पोल-खोल सुरु आहे. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या पाकिस्तानने भारतीय शिष्टमंडळाच्या मार्गात खोडा घालण्याचा प्रयत्न केला. भारतीय शिष्टमंडळाचे सर्व प्रस्तावित कार्यक्रम रद्द करावेत, अशी विनंती पाकिस्तानने मलेशियाकडे केली. पण मलेशियाने पाकिस्तानच्या विनंतीकडे दुर्लक्ष केलं. काश्मीरचा विषय संयुक्त राष्ट्रात असल्याच पाकिस्तानने मलेशियाला सांगितलं. मलेशिया सुद्धा मुस्लिम देश असल्याने पाकिस्तानने धार्मिक कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला. संजय झा यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळाचे सर्वच्या सर्व 10 कार्यक्रम रद्द करावेत, अशी मागणी पाकिस्तानी दूतावासाने मलेशियाकडे केली.
“आपण इस्लामिक देश आहोत. तुम्ही इस्लामिक देश आहात. भारतीय शिष्टमंडळाच ऐकू नका. मलेशियातील त्यांच सर्व कार्यक्रम रद्द करा” असं पाकिस्तानी दूतावासाने मलेशियन सरकारला सांगितलं होतं. पण मलेशियन सरकारने त्यांचं काही ऐकलं नाही. मलेशियाने पाकिस्तानची मागणी फेटाळून लावली. मलेशियन सरकारने नऊ सदस्यीय शिष्टमंडळाला सर्व 10 प्रस्तावित कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी दिली. विविध देशांच्या दौऱ्यावर असलेल्या शिष्टमंडळाला मलेशिया शेवटचा स्टॉप आहे. जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि इंडोनेशिया या देशांचा दौरा या शिष्टमंडळाने केलाय. शनिवारी संजय झा यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळ मलेशियामध्ये पोहोचलं.
कोणा-कोणाची भेट घेतली?
मलेशियाला गेलेल्या शिष्टमंडळाच नेतृत्व जेडीयू खासदार संजय झा करत आहेत. त्यात भाजप खासदार अपराजिता सारंगी, ब्रिज लाल, हेमांग जोशी, तृणमुल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी, सीपीएमचे जॉन ब्रिट्टा, काँग्रेसचे सलमान खुर्शीद आणि बहरीन, फ्रान्सचे माजी राजदूत मोहन कुमार त्यामध्ये आहेत. भारतीय शिष्टमंडळाने मलेशियन पीपल्स जस्टीस पार्टीचे वायबी सीम, माजी पंतप्रधान माहाथीर मोहम्मद यांची भेट घेऊन भारताची भूमिका समजावून सांगितली.