भोपाळ : ‘‘गटबाजी संपवा आणि एकत्र येऊन काम करा. कोणताही निर्णय तुमच्यावर लादला जाणार नाही. तुम्ही एकत्र येऊन निर्णय घ्या. बदलाची गरज वाटत असेल तर आम्ही तो करू,’’ अशी ग्वाही लाेकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांना दिली. राहुल गांधी यांच्या उपस्थितीत राज्यात ‘संघटन सृजन अभियाना’ला सुरुवात झाली. अभियान ३० जूनपर्यंत चालणार आहे.
राहुल गांधी हे मध्य प्रदेशात काँग्रेसचा पाया आणखी मजबूत करण्यासाठी आणि २०२८ च्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी इथे दाखल झाले. संघटन सृजन अभियान सुरू करण्यापूर्वी राहुल गांधी यांनी राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत उपस्थिती दर्शविली आणि प्रमुख नेत्यांसमवेत चर्चा केली. तत्पूर्वी प्रदेशाध्यक्ष जीतू पटवारी आणि माजी मुख्यमंत्री कमल नाथ यांनी राहुल गांधी यांचे विमानतळावर स्वागत केले. यानंतर भोपाळमध्ये प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात बैठक घेतली. यात प्रभारी सरचिटणीस हरिश चौधरी, के.सी.वेणुगोपाल, पटवारी, नाथ, माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह आदी नेते उपस्थित होते. माजी प्रदेशाध्यक्ष अरुण यादव यांनी पत्रकारांशी बोलताना संघटन सृजन अभियानाची माहिती दिली. ते म्हणाले.
हे अभियान राज्यात पक्ष बळकट करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांत उत्साह निर्माण करण्यासाठी सुरू केले आहे. आम्ही बराच काळापासून मध्य प्रदेशात सत्तेत नाहीत. मिशन २०२८ नुसार आम्ही पुन्हा राज्यात सरकार स्थापन करण्याच्या हेतूने काम करू. डिसेंबर २०१८ ते मार्च २०२० या थोड्या कालावधीसाठी काँग्रेसने कमल नाथ यांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन केली. मात्र २००३ पासून काँग्रेस पक्ष सत्तेपासून वंचित आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राज्यात एकही जागा जिंकू शकला नाही. भाजपने मध्य प्रदेशातील २९ लोकसभा जागांवर विजय मिळवला आहे.
राहुल गांधी यांचे निर्देशसंघटनात्मक पातळीवर पक्षाची बांधणी करताना कोणत्याही प्रकारची हयगय केली जाणार नाही, अशी राहुल गांधी यांनी तंबी दिल्याचे सूत्राने सांगितले. यात काही चुका दिसल्या तर तात्काळ बदल करण्यात येईल. तसेच मदत करणाऱ्या नेत्यांचा शोध घ्यावा आणि पात्र व्यक्तींना योग्य स्थान द्यावे, अशी अपेक्षा राहुल गांधी यांनी व्यक्त केली. माध्यम विभागाचे अध्यक्ष मुकेश नायक म्हणाले, राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या जिल्हा समित्या सक्षम करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांना उमेदवार निवडीच्या प्रक्रियेत सामील करून घेण्याचे निर्देश दिले आहेत.
पादत्राणांमुळे वाद
यांच्या भोपाळ दौऱ्यावरून एक वाद निर्माण झाला आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पुष्पांजली वाहताना राहुल गांधी यांनी पादत्राणे काढलेली नसल्याचे व्हिडिओत दिसते. यावरून मुख्यमंत्री मोहन यादव यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, विरोधी पक्ष नेते आमच्याकडे आले आणि त्यांनी यायला हवे. मात्र त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आदरांजली वाहताना पादत्राणे काढले नाहीत. ही बाब खटकण्यासारखी आहे. ही कृती संस्कृतीच्या विरोधात आहे.