मुंबई : मंत्री गिरीश महाजन यांच्या मंत्रालयात अभिषेक कौल नावाचा कोणता व्यक्ती आहे? हा एक ठेकेदार आणि बिल्डर आहे, तो महाजन यांच्या कार्यालयात बसतो. त्याचा फोन आल्याशिवाय महाजन आपत्ती व्यवस्थापनाची एकही फाईल मंजूर करत नाही, असा खळबळजनक आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपाला आता भाजपा नेते, मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कौल फौल कोण आहे हे मला माहीत नाही, असे म्हणत महाजनांनी या आरोपांवर आपले स्पष्टीकरण दिले आहे. अशी व्यक्ती माझ्या कार्यालयात तुम्ही पाहिली आहे का? असा सवालही महाजनांनी केला आहे. पण कौल नावाचे व्यक्ती माझ्याकडे आले होते, असेही यावेळी महाजनांकडून सांगण्यात आले. (Girish Mahajan reply to Sanjay Raut allegations)
ठाकरे गटाचे आमदार संजय राऊत यांनी आरोप केल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, जे राऊतांच्या विरोधात बोलत आहेत, ते त्यांच्या विरोधात आरोप करत सुटत आहेत. म्हणून त्यांच्यावर आता कोणाचाही विश्वास राहिलेला नाही. कौल फोल कोण हे मला माहीत नाही. हा पण ते जळगावचे आहेत हे मला माहीत आहे. मागच्या काळात असलेल्या मंत्र्यांकडे ते तेव्हा आस्थापनेत होते नव्हते मला माहीत नाही. ते माझ्याकडेही आले होते, पण तेव्हा मी त्यांना म्हटले की, मी सरकारी कर्मचारी घेतले आहेत, मी असे कोणालाही घेत नाही. त्याशिवाय तुम्ही प्रसार माध्यमे माझ्याकडे असता, तुम्हीच सांगा या माणसाला तुम्ही माझ्याकडे पाहिले आहे का? माझ्याकडे असलेल्या कोणत्या फाइल पेंडींग आहेत? असे सवाल यावेळी महाजनांनी उपस्थित केले.
हेही वाचा…Sanjay Raut : महाजनांच्या कार्यालयात अभिषेक कौल नावाचा दलाल, राऊतांच्या आरोपांनी खळबळ
तसेच, उगाच काहीतरी खोटे बोलायचे आणि रेटून बोलायचे, बेछूट आरोप करायचे, त्यांच्यावर आणि त्यांच्या मुखपत्रावर कोणाचाही विश्वास राहिलेला नाही. आम्ही ते पाहातही नाही आणि वाचतही नाही. तर, त्यांनी जे सांगितले आहे की, आपत्ती विभागात 350 फाइल पडून आहेत, त्या तुम्ही प्रसार माध्यमांनी येऊन पाहाव्यात खरंच तसे आहे की नाही. त्यामुळे तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये जा आणि तिथे किती फाइल पेंडींग आहेत, ते पाहा. 209 फाइल्स आतापर्यंत माझ्याकडे आलेल्या होत्या. त्यातील 193 फाइल वेळेत गेल्या आहेत. आता 15-16 फाइल आहेत. त्यातील 14 फाइल दोन-चार दिवसांपूर्वी माझ्याकडे आलेल्या आहेत. त्यामुळे असे काही तरी वायफळ बोलायचे, पण त्यांच्यावर कोणी काही बोलले की बेछूट आरोप करायचे, अगदी बेभान आरोप करून सनसनाटी पसरवायची असे प्रत्युत्तर मंत्री गिरीश महाजनांनी दिले आहे.