सोलापूर : वरिष्ठ व निवड वेतनश्रेणीसाठी पात्र शिक्षकांच्या प्रशिक्षणाची ३२ सत्रे आहेत. प्रत्येक सत्रानंतर त्यांची १० प्रश्नांवर चाचणी घेण्याचे नियोजन होते आणि त्यात ५० टक्के गुण घेणे आवश्यक होते. पण, आता ऑनलाइन स्वॉप्टवेअरमध्ये तांत्रिक अडथळे येत असल्याने त्या प्रशिक्षणार्थी शिक्षकांची परीक्षा शेवटी एकत्रित घेतली जाणार असून त्याची लिंक सर्वांना पाठविली जाणार आहे. ३२ सत्रांची मिळून १०० गुणांची परीक्षा नियोजित असून त्यात किमान ५० टक्के गुण घ्यावेच लागणार आहेत.
ज्या शिक्षकास नियुक्तीनंतर १२ वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यांचे वरिष्ठ वेतनश्रेणीचे तर २४ वर्षे सेवा झालेल्या शिक्षकांचे निवड वेतनश्रेणीसाठी प्रशिक्षण सुरू आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून थेट प्रमाणपत्र मिळणार असून ते प्रमाणपत्र संस्थेच्या माध्यामातून शिक्षणाधिकारी कार्यालयास दिल्यावर त्या शिक्षकांना ती वेतनश्रेणी लागू होईल. दरम्यान, प्रशिक्षण पूर्ण केलेल्या आणि परीक्षेत ५० टक्के किंवा त्याहून अधिक गुण घेतलेल्या शिक्षकांची प्रमाणपत्रे ‘एससीईआरटी’कडूनच जिल्ह्याच्या लॉगिनवर येतील. तेथून त्यांना दिली जाणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील १९६६ तर राज्यभरातील सुमारे ४० हजार शिक्षक या वेतनश्रेणीचे प्रशिक्षण घेत आहेत. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या शिक्षकांचा पगार वाढणार आहे.
प्रशिक्षणाचा चुकलेला प्रकार दुरूस्त करता येणार
सोलापूर जिल्ह्यातील एक हजार ९६६ शिक्षक वरिष्ठ व निवड वेतनश्रेणीचे प्रशिक्षण घेत आहेत. सुरवातीला त्यांना आलेल्या अडचणी दूर केल्या आहेत. आता प्रत्येक सत्रानंतर होणारी चाचणी प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर घेतली जाईल. सध्या त्या लिंकमध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत. सध्या एसईआरटीने एक लिंक दिली असून त्यात प्रशिक्षणार्थी शिक्षकांना प्रशिक्षणाचा चुकलेला प्रकार दुरूस्त करता येणार आहे. गैरहजर प्रशिक्षणार्थींची माहिती यापूर्वीच ऑनलाइन अपलोड झाली असून त्यात कोणतीही दुरूस्ती होणार नाही.
- जितेंद्र साळुंखे, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सोलापूर
१५० पेक्षा जास्त शिक्षक अनुपस्थित; त्यांचे आता ऑगस्टमध्ये प्रशिक्षण
वेतनश्रेणीच्या प्रशिक्षणावेळी प्रत्येक तासिका झाल्यावर हजेरी ऑनलाइन अपलोड केली जाणार असल्याचे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) स्पष्ट सांगितले होते. तरीपण, सोलापूर जिल्ह्यातील १५० पेक्षा जास्त शिक्षक पहिल्याच दिवशी किंवा त्या दिवशीच्या एका तासाला गैरहजर राहिले. त्यांची नावे आपोआप राज्य स्तरावरूनच वगळली गेली आहेत. त्यातील बहुतेक शिक्षक आता नियमित प्रशिक्षणासाठी बसत आहेत, मात्र त्यांना प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्रच मिळणार नाही. त्यामुळे त्यांनी आता प्रशिक्षणाला बसू नये, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांचे आता दिवाळीत प्रशिक्षण होणार आहे.