Eknath Shinde And Uddhav Thackeray : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अनेक नेते आपल्या सोईच्या पक्षांत उडी घेत आहेत. असे असतानाच आता महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी माहिती समोर येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील एकूण 5 खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे या खासदारांना पक्षात थांबवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून केली जात असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे.
येत्या 27 जुलैपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन चालू होणार आहे. हे अधिवेशन चालू होण्यापूर्वीच किंवा हे अधिवेशन चालू असतानात हे ऑपरेशन टायगर पूर्ण होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगर पंचायत, महानगरपालिका यांच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळेच ठाकरे गटातले अनेक खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत येण्यासाठी त्यांच्या संपर्कात आहेत. एकूण पाच खासदार शिंदेच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत असे सूत्रांनी सांगितले आहे. हीच आऊटगोईंग थांबवण्यासाठी ठाकरे गटाकडून मोठा प्रयत्न केला जात आहे.
हे पाच खासदार शिंदे यांच्या पक्षाच्या संपर्कात असतील तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठा फटका बसू शकतो. महाविकास आघाडीलाही या ऑपरेशन टायगरचा फटका बसू शकतो.
दरम्यान, पुढच्या काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने आतापासूनच तयारी चालू केली आहे. कोणत्याही परिस्थितीत मुंबई तसेच इतर महागरपालिकांची निवडणूक जिंकायचीच असा निश्चयच उद्धव ठाकरेंच्या पक्षाने केला आहे. असे असताना आता ठाकरेंचे तब्बल पाच खासदार हे शिंदेच्या संपर्कात आहेत, असे सूत्रांकडून कळते आहे. हे जर सत्य असेल तर उद्धव ठाकरे नेमकं काय करणार? जाणाऱ्या खासदारांना ते पुन्हा थांबवू शकणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.