Bangalore Stampede : बंगळुरुतील दुर्घटनेनंतर आरसीबीचा मोठा निर्णय, मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर
GH News June 05, 2025 07:24 PM

बंगळुरूमध्ये बुधवारी 4 जून रोजी झालेल्या दुर्घटनेमुळे आरसीबीच्या विजयाला गाळबोट लागलं. एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत आरसीबीच्या 11 चाहत्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर सर्वच स्तरातून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेनंतर आता रॉयल चॅलेंजर्स बंगुळुरु फ्रँचायजीने मोठा निर्णय घेतला आहे. आरसीबी फ्रँचायजीने 11 मृतांच्या कुटुंबियांसाठी आर्थिक मदत जाहीर केली आहे. आरसीबीने मृतांच्या कुटुंबासाठी प्रत्येकी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच मृतांच्या कुटुंबियांना मदत करता यावी, यासाठी आरसीबीकडून ‘आरसीबी केअर्स’ नावाचा एक निधी देखील तयार केला जात आहे. याबाबतची माहिती आरसीबीकडून सोशल मीडियावरुन देण्यात आली आहे.

आरसीबीने सोशल मीडियावरुन अधिकृत निवेदनाद्वारे आर्थिक मदत देत असल्याचं जाहीर केलं. आरसीबीच्या खेळाडूंचा एका बाजूला सत्कार सुरु होता. तर दुसऱ्या बाजूला मैदानाबाहेर चाहत्यांची चेंगराचेंगरी सुरु होती. त्यामुळे खेळाडू किती असंवेदनशील आहेत, असा आरोपही करण्यात आला. या सर्व दुर्घटनेनंतर आरसीबीने निवेदनाद्वारे कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असल्याचं म्हटलं. तसेच याबाबत दुर्घटनेबाबत माहिती होताच कार्यक्रम थांबवून प्रशासनला सहकार्य केल्याचं या निवदेनात म्हटलं. मात्र तेव्हा आरसीबीने आर्थिक मदत जाहीर केली नव्हती. मात्र त्यानंतर काही तासांनी अखेर आरसीबीने मनाचा मोठेपणा दाखवत आपल्या टीमच्या मृत्यू पावलेल्या चाहत्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याचा निर्णय घेतला.

नक्की काय घडलं?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने गेल्या 17 वर्षांमध्ये जे जमलं नाही ते यंदा करुन दाखवलं. आरसीबीने रजत पाटीदार याच्या नेतृत्वात 18 व्या हंगामात अंतिम सामन्यात पंजाब किंग्सवर मात करत आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं. आरसीबी चौथ्या प्रयत्नात ट्रॉफी जिंकण्याच यशस्वी ठरली. आरसीबीचा अनुभवी खेळाडू विराट कोहली याला या विजयानंतर अश्रू अनावर झाले. विराट त्याचं स्वप्न पूर्ण झाल्याने मैदानात रडू लागला. मैदानात चाहत्यांनी आरसीबी आरसीबी घोषणा दिल्या. बंगळुरुत दिवाळीचं वातावरण पाहायला मिळालं. आरसीबीच्या या विजयानंतर देशासह विदेशातही जल्लोष करण्यात आला. आता खेळाडूंचा घरच्यांकडून सन्मान व्हावा, यासाठी एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सत्कार समारंभांचं आयोजन करण्यात आलं.

आरसीबीचं अधिकृत निवेजन जारी, मृतांच्या नातेवाईकांना मजत जाहीर

पोलिसांनी संभाव्य धोका टाळण्यासाठी आणि वाहतूक कोंडी होऊ नये, यामुळे आरसीबीच्या विजयी मिरवणुकीसाठी परवानगी नाकारली. त्यामुळे स्टेडियममध्ये या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. एम चिन्नास्वामी स्टेडियमची आसन क्षमता ही 30-35 हजार इतकी आहे. त्यात या कार्यक्रमासाठी चाहत्यांना फ्री एन्ट्री होती. त्यामुळे ही तोबा गर्दी झाली. स्टेडियम पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर गेट बंद करण्यात आलं. मात्र त्यानंतरही लाखोंच्या संख्येत आलेले चाहते ऐकायला तयार नव्हते. त्यांनाही स्टेडियममध्ये जायचं होतं. त्यामुळे सुरक्षारक्षक आणि चाहत्यांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला. त्यामुळे जमावला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. त्यामुळे धावाधाव झाली. यात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे 11 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे आरसीबीच्या विजयावर विरजण पडलं.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.