दिवसभरात २२४ वाहनचालकांवर कारवाई
esakal June 05, 2025 10:45 PM

तुर्भे, ता. ५ (बातमीदार) : एपीएमसी परिसरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पोलिसांनी धडक कारवाई केली. एकाच दिवसात २२४ वाहनचालकांना दणका देण्यात आला. पोलिस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शिवाजी भांडवलकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
एपीएमसीमध्ये प्रतिदिन हजारो ट्रक आणि टेम्पोची वर्दळ असते. परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यांलगत चालक बिनधास्त गाड्या उभ्या करतात. परिणामी पादचारी आणि अन्य प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो.
नवी मुंबईत पाम बीचवरही कार दुरुस्ती तसेच अन्य साहित्याची दुकाने आहेत. या दुकानदारांकडून पदपथ आणि पाम बीचवर बेकायदा गाड्या उभ्या केल्या जात असल्याने वाहतूक कोंडी होते. याप्रकरणी तक्रारी दाखल होताच एपीएमसी वाहतूक पोलिस विभागाच्या वतीने विशेष मोहीम हाती घेण्यात आली.

सात जणांवर गुन्हे दाखल
वाहतुकीस अडथळा निर्माण करून धोकादायक वाहन दुरुस्ती करणाऱ्या १६ दुकानदारांवर अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे, तर अन्य सात जणांवर दखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे २२४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. २०२४ मध्ये वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या ९,६२१ जणांवर, तर २०२५ मध्ये अद्यापपर्यंत चार हजार ४०२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे, असे शिवाजी भांडवलकर यांनी सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.