इगतपुरी : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज गुरुवारी (ता. 5 जून) उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. महामार्गाच्या अंतिम टप्प्यातील इगतपुरी बोगद्याच्या उद्घाटनानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सारथ्य स्वीकारले. कारण आधीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ज्यावेळी समृद्धीचे लोकार्पण झाले, तेव्हा शिंदेंच्या गाडीचे सारथ्य त्यावेळी असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले होते. पण आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्याने त्यांच्या गाडीचे सारथ्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले.
विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील 24 जिल्ह्यांना कलाटणी देणाऱ्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या 520 किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. एकूण 701 कि.मी पैकी 625 कि.मी लांबीचा हा महामार्ग सध्या वाहतुकीस सुरू असून आतापर्यंत जवळजवळ 2 कोटी वाहनधारकांनी समृद्धी महामार्गाचा वापर केला आहे. यानंतर आता समृद्धी महामार्गाच्या उर्वरित म्हणजेच 76 कि.मी. लांबीच्या (इगतपुरी ते आमणे) मार्गाचे लोकार्पण करण्यात आले.
हेही वाचा… Ajit Pawar Vs BJP : ठाकरे म्हणतात, अमित शहांनी भाजपा आमदारांना दिला हा आदर्श कानमंत्र
समृद्धी महामार्गाच्या उर्वरित टप्प्यातील 76 कि.मी ची लांबी नाशिक व ठाणे जिल्ह्यात येते. या टप्प्यामध्ये एकूण 5 दुहेरी बोगदे असून या बोगद्यांची लांबी 10.73 कि.मी (दोन्ही मार्गिका मिळून एकूण लांबी 21.46 कि.मी) आहे. त्यातील इगतपपुरी येथील बोगदा 8.00 कि.मी लांबीचा असून हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबी व रुंदीचा (17.61 मीटर) बोगदा आहे. इगतपुरी ते आमणे (ता. भिवंडी) हा 76 किमीचा टप्पा वाहतुकीस सुरू झाल्यानंतर ठाणे (आमणे) व नागपूर पर्यंतचा प्रवास आठ तासांत गाठता येणार आहे. तसेच ठाणे, मुंबई परिसरातून शिर्डी येथे जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुलभ व जलद होईल. याशिवाय शिर्डी, अहिल्यानगर व नाशिक जिल्हयातील सिन्नर व इगतपुरी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या वाहतुकीसाठी मुंबई महानगर प्रदेशात येणे व जाण्यासाठी कमी कालावधी लागेल.