बंगळूर : रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) संघाने पहिल्यांदाच आयपीएल चषक जिंकल्यानंतर आयोजित विजयोत्सवादरम्यान चिन्नास्वामी स्टेडियमजवळ झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेबाबत उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारला चांगलेच फटकारले. ही चेंगराचेंगरी रोखण्यासाठी तुम्ही काय ?, असा जाब विचारत न्यायालयाने कर्नाटक सरकारला नोटीस बजावली आहे.
कर्नाटक उच्च न्यायालयाने चेंगराचेंगरी प्रकरणात स्वतःहून जनहित याचिका (पीआयएल) दाखल केली आहे. आज त्यावर सुनावणी झाली. ‘अशा घटना रोखण्यासाठी प्रमाणित कार्यसूची (एसओपी) असायला नको का? वैद्यकीय कर्मचारी आणि रुग्णवाहिका व्यवस्था असायला नको का? चेंगराचेंगरी झाल्यास काय करावे, याची तयारी का केली नाही? जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करायला नको का?’ असे प्रश्न हंगामी मुख्य न्यायाधीश व्ही. कामेश्वर राव यांनी सरकारला विचारले.
सरकारची बाजू मांडणारे महाधिवक्ता शशिकरण शेट्टी यांनी याचिकेला विरोध करणार नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘‘उच्च न्यायालयाने दिलेल्या सल्ल्याचे पालन करण्यास सरकार वचनबद्ध आहे. बंगळूर पोलिसांनी विजयोत्सवाच्या सुरक्षेसाठी तयारी केली होती. बंदोबस्तासाठी १,६४३ पोलिस कर्मचारी तैनात होते. पाण्याचे टँकर, ‘केएसआरपी’च्या पथकासह अनेक व्यवस्था होत्या. बुधवारी परत १,६०० पोलिस तैनात केले होते. चेंगराचेंगरीत ५६ लोक जखमी झाले. पाच महिला आणि सहा पुरुषांचा मृत्यू झाला आहे. कोलार, कारवार (उत्तर कन्नड), तुमकूर, यादगीर, मंड्या येथून नागरिक बंगळूरला आले होते. बुधवारी तेथे २.५ लाख जण बंगळूरला आले होते.’’
चिन्नास्वामी स्टेडियममध्ये फक्त ३४,६०० जणांसाठी व्यवस्था आहे. फक्त ३३ हजार लोकांना तिकिटे दिली जातात; पण बुधवारी अडीच लाख लोक आले होते. रॉयल चॅलेंजर्सतर्फेच तिकिटे वाटप करतात. ते स्टेडियमची सर्व व्यवस्था बघतात. पहाटे चार वाजल्यापासून संपूर्ण बंगळूरमधून लोक येत होते. पहाटे तीन वाजेपर्यंत चिन्नास्वामी स्टेडियमजवळ मोठी गर्दी होती, असेही शेट्टी यांनी सांगितले.
अहवाल देण्यासाठी नोटीसउच्च न्यायालयाने सरकारला या घटनेचा अहवाल सादर करण्याची नोटीस बजावली आहे आणि सुनावणी १० जूनपर्यंत तहकूब केली. बंगळूर शहर जिल्हा दंडाधिकारी जगदीश यांनी चेंगराचेंगरीची चौकशी सुरू केली आहे. मात्र, उच्च न्यायालयाने स्वतःहून खटला दाखल केला आहे आणि चौकशी सुरू आहे. या प्रकरणी रॉयल चॅलेंजर्सविरोधात ‘एफआयआर’ही दाखल झाला आहे.
पोलिस आयुक्तांना नोटीसचिन्नास्वामी स्टेडियमजवळ झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेचे दंडाधिकारी चौकशी करण्याचे आदेश कर्नाटक सरकारने दिले आहेत. दरम्यान, यासंदर्भात दंडाधिकाऱ्यांनी केएससीए (कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन), आरसीबी(आरसीबी) आणि पोलिस आयुक्तांना नोटीस नोटीस बजावणार असल्याचे सांगितले. बंगळूर शहराचे उपायुक्त जी. जगदीश यांनी गुरुवारी सांगितले की, केएससीए, आरसीबी आणि पोलिस आयुक्त बी. दयानंद यांना चौकशीसमोर हजर राहण्यासाठी नोटीस बजावणार आहेत. दरम्यान, चेंगराचेंगरीच्या जागेची जिल्हाधिकारी जगदीश यांनी पाहणी केली. ‘‘या प्रकरणी मीच चौकशी करणार आहे आणि १५ दिवसांत सरकारला अहवाल सादर करणार आहे. केएससीए, आरसीबीचे व्यवस्थापक, कार्यक्रमाचे व्यवस्थापक आणि पोलिस आयुक्तांना नोटीस बजावणार आहे,’’ असे जगदीश यांनी पत्रकारांना सांगितले.