युद्धबंदी कोणालाही मध्यस्थी केली जात नाही
Marathi June 06, 2025 06:24 PM

राहुल गांधी यांच्या आरोपांना शशी थरुरांचे प्रत्युत्तर

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यासमोर शरणागती पत्करली आहे. ट्रंप यांच्या सांगण्यावरुनच त्यांनी पाकिस्तानशी शस्त्रसंधीचा स्वीकार केला आहे, या राहुल गांधी यांच्या आरोपांना काँग्रेसचेच नेते शशी थरुर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शस्त्रसंधीचा प्रस्ताव पाकिस्तानकडून आला होता. कोणतीही त्यात मध्यस्थी केली नव्हती, अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली आहे. आपल्या मध्यस्थीमुळेच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अणुयुद्ध टळले. अमेरिकेच्या प्रयत्नांमुळे शस्त्रसंधी करण्यात आली, अशी विधाने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी वारंवार केली आहेत. तथापि, भारताने या संबंधी कोणाशीही चर्चा केली नव्हती. तशी आवश्यकताही नव्हती. कारण, ज्या क्षणाला पाकिस्तान थांबेल, त्या क्षणाला आम्हीही थांबणार आहोत, असे भारताने आधीच स्पष्ट केले होते. त्यामुळे जेव्हा पाकिस्तानने शस्त्रसंधीचा प्रस्ताव भारतासमोर ठेवला, तेव्हा भारताने तो स्वीकारला. मध्यस्थीचा प्रश्नच उद्भवला नाही. भारताने आपल्या धोरणानुसार पावले उचलली आहेत, असे प्रतिपादन थरुर यांनी केले.

राहुल गांधी यांचे आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दूरध्वनी केला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शस्त्रसंधी स्वीकारली, असाही आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला होता. या संबंधी थरुर यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. ‘भविष्यात जर पाकिस्तानने भारताची अशा प्रकारे कळ काढली, तर भारत पुन्हा त्या देशाविरोधात शस्त्रबळाचा उपयोग करणार आहे. भारताने आपले हे धोरण स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोणत्याही नेत्याच्या सांगण्यावरुन शस्त्रसंधी स्वीकारली गेलेली नाही, असे स्पष्ट होते, असे उत्तर थरुर यांनी दिले.

पाकिस्तानच्याच भाषेत बोलणार

आम्ही पाकिस्तानशी पाकिस्तानच्याच भाषेत बोलणार आहोत. पाकिस्तानने दहशतवादाची भाषा बोलणे थांबविले नाही, तर आम्ही बळाची भाषा करणारच. आम्ही दहशतवादाविरोधात सौम्य धोरण स्वीकारणार नाही. तसे केल्यास दहशतवाद अधिकच प्रबळ होईल. त्याला ज्या पद्धतीने रोखणे आवश्यक आहे, ती पद्धती भारत भविष्यातही अवलंबिणार आहे, असेही प्रतिपादन थरुर यांनी केले आहे.

अमेरिकेशी संबंध भक्कम

भारताचे अमेरिकेशी संबंध भक्कम आहेत. अमेरिकेशी आमची धोरणात्मक भागिदारी आहे. आमच्या दृष्टीने ही भागीदारी अत्यंत महत्वाची आहे. परिणामी, मी या संबंधांमधील विषयांवर अधिक काही बोलणार नाही. तथापि, पाकिस्तानसंबंधी आमचे धोरण ठरलेले आहे, अशीही मांडणी थरुर यांनी केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.