अरुणाचल प्रदेशात पावसामुळे झालेल्या विविध घटनांत बारा जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील २१४ खेड्यातील सुमारे ३३,२०० नागरिकांना भूस्खलन आणि महापुराचा सामना करावा लागला आहे.
डिबांग जिल्ह्यातील स्थिती गंभीर असून तेथे एक पूल वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. प्रशासन आता ड्रोन आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने साधनसामग्री पोचविण्याचा प्रयत्न करत आहे.
दरम्यान, मणिपूरमध्ये पूरस्थितीत सुधारणा झाली आहे. आसाम रायफल्स आणि लष्कराकडून पूरग्रस्त भागात मदतकार्य वेगाने सुरू आहे. मणिपूरमधील सुमारे १.६५ लाख लोकांना फटका बसला असून ३५,२४२ घरांची पडझड झाली आहे. सिक्कीम राज्यातही मदतकार्य सुरू असून भूस्खलन झालेल्या ठिकाणी पुनर्वसनाचे काम सुरू झाले आहे.
मृतांची संख्या ५० वरआसाम आणि अरुणाचल प्रदेशातील स्थिती अत्यंत बिकट असून आसाममध्ये महापूर आणि भूस्खलनामुळे १९ जणांचा मृत्यू झाला आहे. ईशान्येकडील राज्यांतील मृतांची संख्या ५० वर पोचली आहे.
आसाम १९
अरुणाचल प्रदेश १२
मेघालय ६
मिझोराम ५
सिक्कीम ४
त्रिपुरा २
नागालँड, मणिपूर प्रत्येकी एक
आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानुसार, राज्यातील २१ जिल्ह्यांत महापूराचा परिणाम जाणवत आहे. आतापर्यंत ६.७९ लाखांपेक्षा अधिक लोकांना फटका बसला आहे. १.४९४ गावांत पाणी शिरले असून १४,९७७ हेक्टरवरचे पिके पाण्याखाली गेली आहे. आसाम सरकारने राज्यातील १९० मदत छावण्या उभारल्या असून त्यात ३९,७४६ जण राहत आहेत. दुसरीकडे आसाममध्ये पावसाचा वेग कमी झाला. मात्र अनेक ठिकाणी काल पाऊस पडला. ब्रह्मपुत्र व अन्य आठ नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली.