पुणे - ‘जिल्हा परिषदेच्या बांधकामांचा दर्जा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या धर्तीवरच असावा,’ अशी सूचना करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बांधकाम विभागाच्या सर्व निविदा प्रक्रिया ‘ई-निविदा’ पद्धतीनेच राबवण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. तसेच ‘एकाच कामासाठी दोनवेळा उद्घाटनाला बोलवू नका,’ असे खडेबोल ही जिल्हा परिषद प्रशासनाला सुनावले.
जिल्हा परिषदेची आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता.६) झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, प्रभारी विभागीय आयुक्त कविता द्विवेदी, अतिरिक्त जिल्हाधिकारी चंद्रकांत वाघमारे, प्रकल्प संचालक श्रीमती शालिनी कडू, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात आदी उपस्थित होते. बैठकीपूर्वी शिवराज्याभिषेक सोहळा दिनाच्यानिमित्ताने शिवस्वराज्यगुढी उभी करण्यात आली. तसेच कोविड योद्धा स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले.
बैठकीदरम्यान जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कामकाजावर चर्चा करताना, अजित पवार यांनी विचारले, ‘जिल्हा परिषद कोणत्या रकमेपर्यंतच्या इ निविदा काढते?’ यावर, ‘तीन लाख ते दहा लाखांपर्यंतच्या निविदा जिल्हा परिषद काढते,’ अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली.
त्यावर पवार म्हणाले, ‘दहा लाखांच्या पुढील सर्व कामांसाठी ई-निविदा प्रक्रिया राबवा, तसेच दहा ते पंधरा लाखांच्या पुढील कामे सुचवा. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या पद्धतीने बांधकाम न करता सार्वजनिक बांधकामाच्या धर्तीवर त्याचा दर्जा राखला जावा,’ अशी सूचना अजित पवार यांनी केली. जिल्हा परिषदेकडून आदर्श आरोग्य केंद्रे आणि मॉडेल शाळा उभारण्यात येणार आहेत.
त्याचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. त्याबाबत पवार म्हणाले, ‘बांधकामे ही दर्जेदार आणि दीर्घकाळ टिकणारी असावीत. पूर्वीच्या काळातील इमारती आजही वापरात आहेत, त्याच धर्तीवर काम करा. एखाद्या कामाचे पंचवीस वर्षात दोन वेळा उद्घाटन करावे लागू नये, याची दक्षता घ्या.’
पुणे जिल्ह्यात अद्याप काही भागांत बालकांमध्ये कुपोषण असल्याचे लक्षात घेत पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘ही खूप गंभीर गोष्ट आहे. आंबेगाव, जुन्नर, इंदापूर येथेही कुपोषित बालकांचे प्रमाण अधिक आहे. प्रशासनाकडून जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी आवश्यक सर्व पावले उचलावीत,’ अशी सूचना त्यांनी दिली.
ई-संचित आणि सखी सहेली प्रणालीचे लोकार्पण
या बैठकीत जिल्हा परिषद प्रशासनाच्या ‘ई-संचित’ आणि ‘सखी सहेली’ या दोन नव्या डिजिटल प्रणालीचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले. ‘ई-संचित’ प्रणालीमुळे सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या दिवशीच सर्व संबंधित रकमा मिळू शकणार आहेत.
यात भविष्य निर्वाह निधी, निवृत्तीवेतन, गट विमा, वैद्यकीय प्रतिपूर्ती यांसारख्या सेवा समाविष्ट आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. तर सखी सहेली डिजिटल प्रणाली सेविकांच्या भरतीसाठी विकसित करण्यात आले आहे.
अंगणवाडीसाठी १५ लाखांचा निधी मंजूर करण्याचा निर्णय
बैठकीत अंगणवाड्या बांधण्यासाठी प्रत्येकी ११ लाखांचा निधी मंजूर असल्याचे सांगण्यात आले. यावर म्हणाले, ‘अकरा लाखांमध्ये दर्जेदार बांधकाम शक्य नाही. निधी १५ लाखांपर्यंत वाढवू. त्यासाठी त्वरित प्रस्ताव पाठवा.’
बैठकीतूनच महिला व बालकल्याण विभागाचे सचिव अनुपकुमार आणि वित्त विभागाचे सचिव ओ. पी. गुप्ता यांच्याशी थेट दूरध्वनीवरून संवाद साधत, ‘११ ऐवजी १५ लाखांचे प्रस्ताव पाठवले जातील, त्यांना तातडीने मंजुरी द्या,’ असे स्पष्ट निर्देश दिले.