68479
भात पिकाच्या आधारभूत
किमतीमध्ये तुटपुंजी वाढ
सतीश सावंत ः शेतकऱ्यांच्या सन्मानाची चेष्टा
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ६ ः केंद्र सरकारने भात पिकाच्या आधारभूत किंमतीमध्ये प्रतिक्विंटल केवळ ६९ रुपयांची वाढ केली आहे. लहरी हवामानामुळे भात शेती आधीच अडचणीत आली आहे. यंदाच्या अवकाळी, मॉन्सूनपूर्व पावसामुळे भात उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत भात पिकाच्या आधारभूत किमतीमध्ये नाममात्र वाढ करून मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या सन्मानाची चेष्टा केली आहे, अशी टीका जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष तथा शिवसेना ठाकरे गटाचे कणकवली विधानसभा संघटक सतीश सावंत यांनी केली.
श्री. सावंत म्हणाले, ‘शेतमजूर मिळत नसल्याने बदलत्या काळानुसार कोकणातील शेतकऱ्यांना शेत नांगरणी, भात लावणी, भात कापणीची कामे कृषी यंत्रांद्वारे करावी लागत आहेत. कृषी यंत्रासाठी लागणाऱ्या पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. भात बियाण्यांचे दर, खतांचे दर दुप्पट वाढले आहेत. त्यामुळे भात पिकाचा उत्पादन खर्च वाढला आहे. तसेच अतिवृष्टी, पूरस्थिती, करपा रोग यामुळे भात शेतीचे दरवर्षी नुकसान होत असते. यावर्षी तर हंगामाआधीच मोठ्या स्वरूपाचा पाऊस पडल्याने शेत जमिनीत ओलावा वाढून भात बियाणे पूर्ण क्षमतेने उगवेल की नाही? अशी शंका आहे. असे असताना मोदी सरकारने भात पिकाची किमान आधारभूत किंमत वाढविताना त्यात केवळ ६९ रुपयांची वाढ करून मोठा गाजावाजा केला. ही वाढ तुटपुंजी आहे.’
-------
केवळ ६९ रुपयांची वाढ?
श्री. सावंत म्हणाले, ‘भात शेतीला लागणाऱ्या खतांच्या किमती दुप्पटीने वाढविल्या आहेत. प्रतिक्विंटल २३०० रुपये असलेल्या भाताच्या आधारभूत किंमतीत आता ६९ रुपयांची वाढ करण्यात आली. मात्र, या आधारभूत किमतीतून भात शेतीचा उत्पादन खर्चदेखील भागत नाही. त्यामुळे भाताच्या आधारभूत किमतीत केलेली वाढ म्हणजे शेतकऱ्यांचा सन्मान नसून मोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या सन्मानाची चेष्टा केली आहे.’