बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर 4 जून रोजी झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला. आरसीबीच्या ऐतिहासिक विजयानंतर स्टेडियमबाहेर जल्लोषासाठी चाहते आले होते. मात्र चेंगराचेंगरीत चाहत्यांचा मृत्यू झाला. तर 50 पेक्षा अधिक जण जखमी झाले. त्यामुळे आरसीबीच्या या विजयी जल्लोषाचं रुपांतर क्षणात शोकात झालं. या प्रकरणात कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशन, आरसीबी आणि डीएनए या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीविरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशनच्या 2 पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणात आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. केएससीएचे सचिव ए शंकर आणि कोषाध्यक्ष ई जयराम या दोघांनी राजनीमा दिलाय. या दोघांनी केएससीएच्या अध्यक्षांकडे राजीनामा सूपूर्द केला आहे.
केएससीएचे सचिव ए शंकर आणि कोषाध्यक्ष ई जयराम यांनी संयुक्त निवेदन जारी केले आहे. या दोघांनी निवेदनातून कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रघुराम भट यांना राजीनामा सादर केल्याची माहिती दिली आहे. बंगळुरूमधील दुःखद घटनेनंतर आम्ही केएससीएचे सचिव आणि कोषाध्यक्ष या आमच्या संबंधित पदांचा राजीनामा दिला आहे, असं या निवदेनात या दोघांनी नमूद केलंय. तसेच या प्रकरणात आमची भूमिका खूपच मर्यादित होती, असंही स्पष्ट केलं आहे.
चेंगराचेंगरी प्रकरणात पोलिसांनी आरसीबीचा मार्केटिंग हेड निखिल सोसाळे याला बंगळुरुतील विमानतळावरुन अटक केली. तसेच इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या तिघांनाही अटक करण्यात आलीय. या चौघांची चौकशी केली जात आहे. तर शुक्रवारी 6 जून रोजी आरसीबीचा फलंदाज विराट कोहली याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. विराटने विजयी मिरवणुकीसाठी मॅनेजमेंटवर दबाव आणल्याचा आरोप हा तक्रारदाराकडून करण्यात आला आहे.
दरम्यान या सर्व प्रकरणानंतर राज्य सरकारकडून पोलीस आयुक्तांसह अनेक अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं. तर दुसऱ्या बाजूला या दुर्घटनेला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात करण्यात आला. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.
आरसीबीने 3 जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात पंजाबवर मात करत आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं. त्यानंतर 4 जून रोजी एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळाडूंच्या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं. त्यासाठी चाहत्यांनाही आमंत्रित करण्यात आलं. स्टेडियममध्ये चाहत्यांना फ्री एन्ट्री ठेवण्यात आली. स्टेडियमची क्षमता 30-35 हजार इतकी होती. काही क्षणात स्टेडियम हाऊसफुल्ल झालं. त्यामुळे गेट बंद करण्यात आलं. मात्र लाखोंच्या संख्येत आलेल्या चाहत्यांनाही स्टेडियममध्ये जायचं होतं. मात्र स्टेडियम हाऊसफुल्ल होताच गेट बंद करण्यात आला. त्यामुळे सुरक्षारक्षक आणि चाहत्यांमध्ये गेटवर जोरदार संघर्ष झाला. त्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि 11 जणांचा मृत्यू झाला.