Jaipur family court divorce case : जेव्हा एखाद्या नात्याची सातत्याने उपेक्षा होते, तेव्हा त्याचा परिणाम केवळ त्या व्यक्तीवरच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबावर होतो. असाच एक असामान्य प्रकार जयपूरमधून समोर आला आहे. येथे एका पत्नीने गेली १५ वर्षे शारीरिक संबंधांना नकार दिल्याने वैतागलेल्या पतीने अखेर घटस्फोटासाठी अर्ज केला. विशेष म्हणजे, जयपूरच्या कौटुंबिक न्यायालयाने हा अर्ज मंजूर करताना पत्नीचा नकार हा ‘मानसिक क्रूरता’ असल्याचे स्पष्ट केले.
नेमके प्रकरण काय?या दाम्पत्याचा विवाह २००३ मध्ये झाला होता. विवाहाच्या पहिल्या रात्री पतीने पत्नीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, परंतु तिने स्पष्टपणे नकार दिला. पतीला वाटले की, कालांतराने ती या नात्यासाठी तयार होईल, म्हणून त्याने संयम राखला. मात्र, पुढील १५ वर्षांत त्याने अनेकदा प्रयत्न करूनही प्रत्येक वेळी पत्नीने स्पष्ट शब्दांत नकार दिला.
इतकेच नव्हे, तर गेल्या काही वर्षांपासून ती पतीपासून वेगळी राहू लागली. अखेर कंटाळलेल्या पतीने जयपूरच्या कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. नुकत्याच झालेल्या सुनावणीत न्यायालयाने पतीचा अर्ज मंजूर केला आणि शारीरिक संबंधांना नकार देणे ही ‘मानसिक क्रूरता’ असल्याची टिप्पणी केली.
पत्नीचे आरोप, पण पुरावे नाहीसुनावणीदरम्यान पत्नीने शारीरिक संबंधांना नकार दिल्याची कबुली दिली. तिने बचावासाठी पतीवर अन्य महिलांशी अवैध संबंध असल्याचा गंभीर आरोप केला. मात्र, जेव्हा न्यायालयाने याबाबत पुरावे मागितले, तेव्हा ती कोणताही ठोस पुरावा सादर करू शकली नाही. यामुळे न्यायालयाने पतीच्या बाजूने निकाल देत घटस्फोट मंजूर केला.
न्यायालयाचा निर्णयजयपूरच्या कौटुंबिक न्यायालयाने या प्रकरणात पतीच्या बाजूने निकाल देताना सांगितले की, १५ वर्षे शारीरिक संबंध न ठेवणे हे मानसिक क्रूरतेच्या श्रेणीत येते. अशा परिस्थितीत वैवाहिक नात्याची पुनर्स्थापना अशक्य आहे. या निर्णयाने पतीला न्याय मिळाला असून, समाजात वैवाहिक नात्यांमधील संतुलन आणि कायदेशीर हक्कांबाबत चर्चा सुरू झाली आहे.