मुंबई - ‘राज आणि उद्धव ठाकरे हे दोघे भाऊ आहेत. दोघे योग्य वेळी योग्य निर्णय घेतील. दोघे एकत्र येतील हा मला विश्वास आहे. इतरांनी कुणी कितीही काहीही केले तरी हे दोन्ही भाऊ एकत्र येतील.’ असा दावा शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी शनिवारी केल्याने राज्याच्या राजकारणात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे एकत्र येण्याबाबत महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे तेच होईल. आता संदेश देणार नाही, थेट बातमीच देणार, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. आता याबाबत शंका घेण्याचे काहीच कारण नाही,’ असा निर्वाळा ठाकरे राऊत यांनी दिला आहे.
पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकात उद्धव आणि राज ठाकरे यांचे एकत्रित छायाचित्र आज प्रसिद्ध झाल्यानंतर युतीबाबतच्या चर्चेला बळकटी मिळाली आहे. माध्यमांशी आज सकाळी बोलताना राऊत म्हणाले, की महाराष्ट्र म्हणजे मराठी माणूस.
महाराष्ट्र म्हणजे भाजप नाही. तो उपऱ्यांचा पक्ष आहे. त्यांना मराठी माणूस, महाराष्ट्राची अस्मिता, १०६ हुतात्मे यांच्याशी काहीही देणेघेणे नाही. ते व्यापारी आहे. मात्र, आम्ही महाराष्ट्राच्या अस्मितेवर ठाम आहोत. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी जनतेच्या जे मनात आहे, तेच आमच्याही मनात आहे.
मराठी माणसाचा आवाज महाराष्ट्राचा आवाज
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अनेक पक्ष मतभेद विसरून एकत्र आले. त्यावेळी मराठी माणसाचा विजय झाला. मुंबईसह महाराष्ट्र आपल्याला मिळाला. सध्याच्या काळात भाजपने महाराष्ट्रात असेच वातावरण निर्माण केले आहे. त्यामुळे मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, मराठी माणसाचा आवाज हाच महाराष्ट्राचा आवाज असे मानणाऱ्या पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे राऊत म्हणाले.
‘फडणवीस यांचे राजकीय ज्ञान अगाध आहे. ते नवीन गीता लिहिणार आहेत. त्यांना सर्व समजते. इतर सर्वजण मूर्ख आहेत, असे ते समजतात. कोणाच्या मेहरबानीने मुख्यमंत्रिपद मिळवणे म्हणजे राजकारण समजते असे होत नाही, असा टोला राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता लगावला.
‘तुरुंगात जायचे वय नाही’
एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत संजय राऊतांनी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, एकनाथ शिंदे हा माझा अत्यंत जवळचा मित्र. तो सांगत होता की तू पण चल. ‘हे माझे तुरुंगात जायचे वय नाही. आता मला नातवंडे झाली आहेत. मी म्हटले मलापण नातवंडे झाली आहेत.
ज्या पक्षाने तुम्हाला इतकी वर्ष दिले आहे, त्यांच्या छातीवर पाय ठेवून बाहेर पडणे हे म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केल्यासारखे आहे. तुम्ही सुद्धा धीर धरा, शांत राहा आणि घाबरू नका. आता हे ज्यावेळी मी सांगतो, त्यावेळी पक्ष फुटला. ते घाबरट लोक आहेत म्हणून गेले.