Vijay Wadettiwar : महायुतीने 'फिक्सिंग' करून निवडणूक जिंकली; काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप
esakal June 08, 2025 06:45 PM

नागपूर : महाराष्ट्रातील सरकार जनमताच्या आधारावर आलेले नसून हे ‘जग्लरी‘ सरकार आहे. निवडणूक आयुक्त आणि तत्कालीन सरकारने फिक्सिंग तसेच यंत्रांचा गैरवापर करून ही निवडणूक जिंकल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळाचे पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी येथे आज माध्यमांशी बोलताना केला.

महाराष्ट्रात महायुतीने बेइमानी करून निवडणूक जिंकली. राहुल गांधी यांनी लेखातून जे मांडले ते सत्य मांडल आहे. त्याचा खुलासा तुमच्यात दम असेल तर करावा. यावर चर्चा करण्यासाठी तयार आहे असे आव्हान त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले. २०१४ तसेच २००९ च्या निवडणुकीत मतदानाची वेळ संपल्यानंतर सरासरी फक्त तीन टक्केच मतदान वाढल्याची आकडेवारी आहे.

२०२४ च्या निवडणुकीत मात्र मतदानाची वेळ संपल्यानंतर तब्बल ८.७४ टक्के मतदान वाढले आहे. राहुल गांधी यांनी कामठीचे उदाहरण दिले आहे. त्यात त्यांनी पाच महिन्यात ३५ हजार वाढलेले मतदार आले कुठून असे म्हटले आहे.

त्याचा खुलासा करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. बावनकुळे यांनी जी माहिती दिली ती वस्तुस्थितीला धरून नाही. ते चुकीची माहिती देत आहेत. मतदानाची वेळ संपल्यानंतर ८.७४ वाढलेले मतदान बघता गैरप्रकार झाल्याचे स्पष्ट होते. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी झालेल्या सर्वेक्षणात महायुतीचा पराभव हेच दर्शवण्यात आले होते.

त्यानंतरही ८९ टक्के स्ट्राईक रेट कासा काय असू शकतो? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला. देशाच्या इतिहासात आजवर कुठल्याच राज्याच्या निवडणुकीत असे झाले नाही. आमची सर्वांची भूमिका राहुल गांधी यांनी मांडली. यावर कुणाची खुली चर्चा करण्याची तयारी असेल तर आम्ही तयार आहोत. हे सरकार मुळात ओबीसीचे नाव घेऊन स्थापन केले आहे. आता ओबीसींना वाऱ्यावर सोडले आहे. ओबीसी विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप थांबवण्यात आली. महाज्योतीला ही स्कॉलरशिप देण्यात आली नाही. ओबीसी विद्यार्थ्यांना बाजूला ठेवून अन्याय करण्याचे काम महायुती सरकार करत आहे असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.