आता खूप उशीर… बाळासाहेबांच्या… ठाकरे बंधूंच्या युतीवर दीपाली सय्यद यांचं मोठं विधान; नेमकं काय म्हणाल्या?
GH News June 08, 2025 07:06 PM

राज्यात सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा आहे. मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांकडून याबाबत संकेत देण्यात आले आहेत. काही राजकीय नेत्यांकडून ही युती महाराष्ट्राच्या फायद्याची ठरणार असल्याचे म्हटले जात आहे, तर काही नेत्यांनी यावर टीकाही केली आहे. अशातच आता शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद यांनीही ठाकरे बंधूंच्या युतीवर भाष्य केले आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

ठाकरे बंधू स्वार्थासाठी एकत्र येतायेत – सय्यद

दीपाली सय्यद यांनी राज्यातील अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. उद्धव आणि राज ठाकरेंच्या एकत्र येण्यावर दीपाली सय्यद यांनी म्हटले की, ‘कुटुंबाच्या वादासाठी दोघे एकत्र येत असतील तर ही चांगली गोष्ट आहे. पण जर ते राजकारणासाठी एकत्र येत असतील तर ही जर आणि तर ची गोष्टी आहे.’

दीपाली सय्यद यांनी पुढे बोलताना सांगितले की, ‘भावा-भावांमध्ये जर भांडण असेल तर त्यांनी नक्कीच एकत्र यावं. पण जर राजकारणासाठी तुम्ही आता एकत्र येत आहेत तर तुम्ही स्वतःचा स्वार्थ पाहताय. तुम्ही स्वार्थासाठी एकत्र येतायेत. आता खूप उशीर झालेला आहे. युती खूप आधी व्हायला हवी होती. बाळासाहेबांच्या मनात पण ते होतं. पण तेव्हा तुम्ही युती केली नाही.”

एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांची पोकळी भरुन काढली

दीपाली सय्यद यांनी एकनाथ शिंदेंचे कौतुक करताना म्हटले की, ‘बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर त्यांची पोकळी जर कोणी भरून काढली असेल तर ते आहेत एकनाथ शिंदे.नेता कसा असावा, जो रस्त्यावर उतरून गोरगरिबांचा विचार करणारा, त्यांच्या मनातले ऐकणारा आणि त्यांच्यासाठी काम करणारा नेता असला पाहिजे. हेच आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं.’

शिवसेनेत मोठा पक्षप्रवेश होणार

दीपाली सय्यद यांनी उद्या शिवसेनेत मोठा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती दिली आहे. हा पक्षप्रवेश महाराष्ट्राच्या हितासाठी असणार आहे. संजय राऊतांच्या जवळचे काही लोक पक्षप्रवेश करणार आहेत.याचा राज्याला फायदा होणार आहे अशी माहितीही सय्यद यांनी दिली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.