म्हशींची बेकायदा वाहतूक; तिघांवर गुन्हा
esakal June 08, 2025 09:45 PM

खालापूर, ता. ८ (बातमीदार) : टेम्पोतून दाटीवाटीने १९ जनावरांची वाहतूक करताना एका म्हशीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी खालापूर पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून बार्शी (सोलापूर) येथून १९ म्हशींना विनापरवाना मुंबई येथे वाहतूक होत असल्याची माहिती खालापूर पोलिस निरीक्षक सचिन पवार यांना मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिसांनी शुक्रवारी (ता. ६) संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास खालापूर टोलनाका येथे सापळा रचला. मिळालेल्या वर्णनाचा टेम्पो खालापूर टोलनाका येथे आला असताना पोलिसांनी टेम्पो ताब्यात घेत चालक आणि क्लीनर यांची चौकशी केली. टेम्पोची तपासणी केली असताना त्यामध्ये १९ म्हशींना दाटीवाटीने भरून तसेच त्यांना चारा, पाणी व हवा याची कोणतीही व्यवस्था न करता देवनार मुंबई येथे नेत असल्याचे स्पष्ट झाले. १९ म्हशींपैकी एकीचा मृत्यू झाल्याचे तपासणीत उघड झाले. याबाबत खालापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलिस हवालदार अमित सावंत करीत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.