ठरतोय तिसरा डोळा प्रभावी, नेपाळी चोरट्यांचे फोडले बिंग
esakal June 09, 2025 01:45 AM

तिसरा डोळ्याने नेपाळी चोरट्यांचे फोडले बिंग
जवळपास १०० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले
पंकज रोडेकर
ठाण्यातील चरई हा परिसर टेंभीनाक्याला लागूनच आहे. शहराच्या मध्यवर्ती आणि सुरक्षित असलेल्या या परिसरात १२ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास तब्बल १४ दुकानांचे शटर उचकटण्यात आल्याची बाब समोर आली. त्यामुळे ठाणेकर नागरिकांसह व्यापारीवर्गामध्ये भीतीचे चित्र निर्माण झाले आणि पोलिसांनाही आव्हान निर्माण करणारी घटना घडली, पण या घटनेत तिसरा डोळा आणि पोलिसांचे तपास कौशल्य कामी आले. ठाणे, भिवंडी आणि नालासोपारा या शहरांसह याशिवाय मुलुंड अशा मार्गक्रमणानंतर चोरटे हाती लागले. सुरुवातीला चोरटे भामटे असल्याचा कयास होता, मात्र त्यांना पकडल्यानंतर दिवसा सलाम साब असा जागता पहारा देणारे नेपाळी निघाले. विशेष म्हणजे या तपासात सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह रिक्षावाला आणि भुर्जी पाववाला हे चोरट्यांचे खऱ्या अर्थाने दिशादर्शक ठरले.
त्या चोरीच्या घटनेनंतर नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या चोऱ्यांचा समांतर तपास ठाणे शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविला होता. पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. यातच चोरटे चोरी केल्यानंतर वेगवेगळ्या मार्गाने निघून गेल्याचे आढळले. याचदरम्यान वेगवेगळ्या ८० ते १०० सीसीटीव्हींमधील फुटेजने ठाणे शहरापासून नालासोपारा परिसर पोलिसांना फिरवले. दरम्यान, एक चोरटा हा भिवंडीतील रिक्षातून ठाण्यात उतरताना दिसला. तेथून तपासाची चक्रे फिरली. पोलिसांनी त्या चालकाचा शोध घेतल्यावर चोरटा हाती लागेल असे वाटले, पण तो काही हाती लागला नाही. त्यातच चोरटा नालासोपारा येथील चौकात एका भुर्जी पाववाल्याच्या गाडीवर दिसून आला.
चौकशीत पोलिसांनी त्याच्या भावाचा शोध घेतला, त्यानंतर महंत कामी पोलिसांच्या जाळ्यात अडकला गेला. अशाप्रकारे एक मिळाल्यावर दुसरा हाती लागेल असे वाटले होते, पण मिरारोड आणि उल्हासनगर हे अंतर पाहता, त्यांच्यात संपर्काचा अभाव होता. विष्णू कामी यांच्या मोबाईलवरून संपर्क होत होता, पण विष्णू हा व्हॉट्सअप कॉलसाठी वेगळा ॲप वापरत होता. तसेच तो कॉल करण्यासाठी वायफायचा वापर करायचा. याचदरम्यान विष्णूने संपर्क केल्यावर त्याला बोलवून घेत, मुलुंडला त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले.

ठाण्यापूर्वी नवी मुंबईत केली होती चोरी
ठाणे शहरात १४ दुकाने फोडण्याच्या चोवीस तास म्हणजे आदल्या दिवशी त्यांनी नवी मुंबई कामोठे येथे दुकाने फोडली होती. यामध्ये महंत याच्या दुकानांचे शटर उचकटण्याची विशिष्ट पद्धत होती. तो एकटाच आपल्या ताकदीने सहज दुकानांचे शटर उचकटण्यात माहीर असल्याचे तपासात समोर आले.

अशी होती चोरीची पद्धत
चोरी करताना त्यांचे काम ठरली होती. महंत हा बंद दुकानांचे शटर उचकटून चोरी करायचा, तर विष्णू हा काही अंतरावर लांब उभा राहून रेकी करीत असल्याचे उघड झाले. या दोघांनीही ठाणे, मुंबई आणि नवी मुंबई परिसरात चोरीचे नऊ गुन्हे केले होते. नऊपैकी चार गुन्हे दोघांनी, तर उर्वरित पाच हे महंत याने साथीदारांच्या मदतीने केल्याचेही तपासात उघड झाले.

दोघांचा दिवसा सुरक्षा रक्षक आणि रात्री चोरीचा उद्योग
महंत आणि विष्णू हे दोघेही मूळचे नेपाळी असले तरी, महंत हा मीरारोड, तर विष्णू उल्हासनगर भागात सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत होता. दोघेही दिवसा सुरक्षा रक्षक म्हणून काम करायचे, तर रात्री चोऱ्या करीत असल्याची माहिती तपासात समोर आली. विष्णूविरोधात मिरा-भाईंदरमध्ये एक गुन्हा यापूर्वी दाखल झाला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.