रत्नागिरी : शिवसेनेचे माजी खासदार गजानन कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र येत अखंड शिवसेना उभी करण्याचा विचार करावा, असं म्हटलं होतं. याशिवाय गजानन कीर्तिकर हे एकनाथ शिंदेंची शिवसेना भाजपप्रणित, उद्धव ठाकरेंची शिवसेना काँग्रेसप्रणित असल्याचं म्हटलं होतं. आता बाळासाहेब ठाकरेंच्या विचारानं पुढं जाणारी शिवसेना हवीय असं गजानन कीर्तिकर म्हणाले होते. कीर्तिकर यांच्या या वक्तव्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रामदास कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गजानन कीर्तिकरांचं मत वैयक्तिक असून त्यांची भूमिका पक्षाची नाही, असं कदम म्हणाले.
गजानन कीर्तिकर साहेब जे बोलले ते त्यांचं वैयक्तिक मत आहे, पक्षाचं मत नाही. मला त्यांनी फोन केला होता,माझं त्यांच्याशी बोलणं झालं आहे. कीर्तिकर यांचा विषय होता तो वैयक्तिक होता, त्यांची भूमिका पक्षाची नाही, असं रामदास कदम म्हणाले.
उद्धव ठाकरेंकडे फक्त हम दोने हमारे तीन एवढेच शिल्लक राहणार हे अनेकदा बोललो आहे. शिवसेना नाव आमच्याकडे आहे शिवसेनेचा चिन्ह आमच्याकडे आहे. ठाकरे ब्रँड आता आमच्याकडे आहे, असं रामदास कदम म्हणाले. उद्धव ठाकरेंनी काँग्रेससोबत सोयरिक केली त्यांच्याकडे ठाकरे ब्रँड कसा असू शकतो असा सवाल रामदास कदम यांनी केला.
वरळीत आदित्य ठाकरे उभे असताना मनसेने मदत केली आणि आदित्य ठाकरेंना निवडून आणलं. मात्र, राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे ज्या वेळेला उभा राहिला त्यावेळी त्यांच्यासमोर उद्धव ठाकरे यांनी उमेदवार दिला आणि त्याला पराभूत केलं. ही गोष्ट राज ठाकरे विसरले नसतील. मनसेचे 7 नगरसेवक होते त्यापैकी 6 नगरसवेक घेतले हे उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत घेतले ही गोष्ट राज ठाकरे विसरले नसतील. उद्धव ठाकरे संधीसाधू आहेत, असा हल्लाबोल देखील रामदास कदम यांनी केला आहे.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या प्रश्नावर रामदास कदम यांनी आता दोन्ही पवार एकत्र नाहीत असं तुम्हाला म्हणायचे आहे का??? माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. शरद पवार हे देशातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असेल तर माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत, असं रामदास कदम म्हणाले.
आणखी वाचा