पुणे : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत मराठी साहित्याची पताका उंचावल्यानंतर आता एकेकाळची मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या साताऱ्यात सारस्वतांचा मेळा भरणार आहे. आगामी ९९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात होणार असल्याची घोषणा रविवारी झाली. साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फाउंडेशनला शताब्दीच्या उंबरठ्यावरील ऐतिहासिक संमेलनाच्या आयोजनाचा मान मिळाला आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या रविवारी पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. या बैठकीला उपाध्यक्ष गुरय्या स्वामी, कार्यवाह सुनीताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यासह सर्व घटक, समाविष्ट आणि संलग्न संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
आगामी साहित्य संमेलनासाठी औदुंबरचे सदानंद साहित्य मंडळ, इचलकरंजी येथील महाराष्ट्र साहित्य परिषद, कोल्हापूरची दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा आणि साताऱ्यातील शाहूपुरीची महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा या चार संस्थांकडून निमंत्रणे आली होती. संमेलनाचे स्थळ निश्चित करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या स्थळ निवड समितीने गेल्या तीन दिवसांत या चारही स्थळांना भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर रविवारी झालेल्या समितीच्या बैठकीत साताऱ्याला संमेलन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. महामंडळाच्या बैठकीत समितीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले.
अपेक्षेप्रमाणे साताऱ्यात संमेलनआगामी संमेलनासाठी चारही निमंत्रणे पाहता संमेलन पश्चिम महाराष्ट्रात होणार असल्याचे निश्चित झाले होते. त्यातही औदुंबर आणि इचलकरंजी ही दोन्ही स्थळे यापूर्वी अपुऱ्या व्यवस्थेमुळे अनेकदा नाकारण्यात आली होती. दुसरीकडे साताऱ्याचे निमंत्रण गेल्या काही वर्षांपासून सातत्याने येत होते. महामंडळातील काही विद्यमान पदाधिकारी साताऱ्याचेच असल्याने या स्थळावरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता अधिक होती. त्यानुसार रविवारी अपेक्षेप्रमाणे साताऱ्यातच संमेलन होणार असल्याचे निश्चित झाले.
साताऱ्यातील चौथे संमेलनसाताऱ्याला ३२ वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मान मिळाला असून, साताऱ्यात होणारे हे चौथे संमेलन आहे. १८७८ मध्ये ग्रंथकार संमेलन सुरू झाल्यानंतर तिसरे संमेलन १९०५ मध्ये रघुनाथ करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यात झाले होते. १९६२ मध्ये न. वि. गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली ४४ वे; तर १९९३ मध्ये विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली ६६वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येथे झाले होते.
शाहू स्टेडियमवर होणार संमेलनसंमेलनाचे नियोजित स्थळ छत्रपती शाहू स्टेडियम आहे. योगायोगाने १९९३ मध्ये झालेले ६६वे संमेलन याच ठिकाणी झाले होते. हे स्टेडियम १४ एकरांत असून, तिथे मुख्य मंडप, दोन अन्य मंडप, ग्रंथ प्रदर्शन, कवी कट्टा, गझल कट्टा, तसेच भोजन व्यवस्था करण्यात येणार आहे. अन्य छोटे कार्यक्रम करण्यासाठी तीन सभागृहे उपलब्ध असून, २५ हजार प्रेक्षक क्षमता असलेली गॅलरीदेखील उपलब्ध आहे.