भारतीय अ संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून दुसरा चार दिवसीय सामना नॉर्थम्पटनमध्ये सुरू आहे. इंग्लंड अ संघाविरुद्ध (England Lions) सुरू असलेल्या या सामन्यात केएल राहुलने कमालीचा खेळ केला आहे. त्याने दोन्ही डावात शानदार फलंदाजी केली आहे.
या सामन्यात वर्चस्व दिसून येत आहे. तिसऱ्या दिवस अखेर भारताने १८४ धावांनी आघाडी घेतली आहे. कर्णधार अभिमन्यू ईश्वरनने शानदार खेळी केली.
या सामन्यात तिसऱ्या दिवशी इंग्लंडने पहिल्या दिवशी ४७ व्या षटकापासून आणि ३ बाद १९२ धावांपासून पुढे खेळायला सुरूवात केली. त्यावेळी जॉर्डन कॉक्स आणि कर्णधार जेम्स ऱ्ह्यु हे नाबाद होते.
त्यांनी तिसऱ्या दिवशीही सुरुवात चांगली करण्याचा प्रयत्न केला. पण खलील अहमदने जॉर्डन कॉक्सला ४५ धावांवर ध्रुव जुरेलच्या हातून झेलबाद केले. खलीलनेच ५५ व्या षटकात जेम्स ऱ्ह्यूला १० धावांवर माघारी धाडले. याच षटकात खलीलने जॉर्ज हिलला शून्यावर त्रिफळाचीत केले. त्यामुळे इंग्लंडचा निम्मा संघ माघारी परतला.
खलीलचा वेगवान मारा सुरूच होता. त्याने ख्रिस वोक्सलाही ५७ व्या षटकात ५ धावांवर माघारी धाडले. पण नंतर मॅक्स होल्डन आणि फरहान अहमदने बरीच झुंज दिली. पण होल्डनला ७ धावांवर तुषार देशपांडेने त्रिफळाचीत केले. ७६ व्या षटकात फरहान अहमदला २४ धावांवर नितीश रेड्डीने बाद रेले.
पण शेवटच्या विकेटसाठी जोश टंग आणि एडी जॅक यांनी ४८ धावांची भागीदारी केली आणि भारताची आघाडी बरीच कमी केली.
अखेर ८९ व्या षटकात एडी जॅकला १६ धावांवर अंशुल कंबोजने १६ धावांवर बाद करत इंग्लंडचा डाव ८९ षटकात ३२७ धावांवर संपवला. भारताला २१ धावांची आघाडी मिळाली. जोश टंग ३६ धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडकडून या डावात एमिलयो गेने ७१ धावांची, तर टॉम हेन्सने ५४ धावांची खेळी केली होती.
या डावात भारताकडून खलील अहमदने चांगली गोलंदाजी करताना ४ विकेट्स घेतल्या. तसेच अशुल कंबोज आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तनुष कोटियन आणि नितीश रेड्डी यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
त्यानंतर भारताचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरला. दुसऱ्या डावात भारताने सलामीवीर यशस्वी जैस्वालची विकेट चौथ्याच षटकात ५ धावांवर गमावली. पण नंतर केएल राहुलला कर्णधार अभिमन्यू ईश्वरनने दमदार साथ दिली.
या दोघांनी ८८ धावांची भागीदारी केली. यादरम्यान अर्धशतक पूर्ण केले. त्याने पहिल्या डावातही शतकी खेळी केली होती. मात्र या डावात अर्धशतकानंतर त्याला लगेचच एडी जॅकने जोश टंगच्या हातून झेलबाद केले. केएल राहुलने ६४ चेंडूत ५१ धावांची खेळी केली.
त्यानंतर करुण नायरने ईश्वरनला चांगली साथ दिली होती. पण नायरला २८ व्या षटकात १५ धावांवर ख्रिस वोक्सने बाद केले. तरी ईश्वरन शतकाच्या दिशेने वाटचाल करत होता. पण त्याचा अडथळा ३२ व्या षटकात ख्रिस वोक्सनेच दूर केला. त्याला मॅककिनीच्या हातून झेलबाद केले. ईश्वरनने ९२ चेंडूत १० चौकारांसह ८० धावा केल्या.
दरम्यान, काही काळ त्याआधी सामना खराब प्रकाशामुळे थांबला होता. पण नंतर पुन्हा खेळ सुरू झाला आणि नंतर तिसरा दिवस भारताच्या दुसऱ्या डावातील ३३ षटकानंतर थांबला. भारताने दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवस अखेर ३३ षटकात ४ बाद १६३ धावा केल्या. ध्रुव जुरेल ६ धावांवर आणि नितीश कुमार रेड्डी १ धावेवर नाबाद आहे.