टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याची 20 जूनपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडिया शुबमन गिल याच्या नेतृत्वात इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्याआधी इंग्लंड लायन्स विरुद्ध इंडिया ए यांच्यात 2 अनऑफिशियल टेस्ट मॅचची टेस्ट सीरिज पार पडली. ही मालिका 0-0 ने बरोबरीत राहिली. दोन्ही संघांनी बरोबरीची लढत दिली. या मालिकेत अभिमन्यू इश्वरन याने इंडिया ए टीमचं नेतृत्व केलं. इंडिया ए च्या खेळाडूंनी या मालिकेत शानदार कामगिरी केली. त्यामुळे आता क्रिकेट चाहत्यांना कसोटी मालिकेचे वेध लागले आहेत.
अनऑफिशियल टेस्ट सीरिजमध्ये इंडिया ए टीमकडून पहिल्या सामन्यात करुण नायर याने द्विशतक झळकावलं. तर दुसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात केएल राहुल याने शतकी खेळी केली. तर दुसऱ्या डावात मुंबईकर तनुष कोटीयन याला शतक करण्याची संधी होती. मात्र कर्णधार अभिमन्यू इश्वरन याने ती संधी हिसकावली, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. तनुष शतकापासून अवघ्या 10 धावा दूर असतानाच अभिमन्यूने डाव घोषित केला.
उभयसंघातील दुसरा सामना हा 9 जून रोजी चौथ्या आणि अंतिम दिवशी अनिर्णित राहिला. केएल राहुल याने पहिल्या डावात शतक लगावलं. तर तनुष कोटीयन दुसऱ्या डावात शतकाच्या उंबरठ्यावर होता. मात्र तनुष कर्णधाराच्या निर्णयामुळे शतकापासून वंचित राहिला.
इंडिया ए टीमने दुसर्या डावात 253 धावांवर सहावी विकेट गमावली. त्यानंतर तनुष आठव्या स्थानी मैदानात आला. तनुषने इंग्लंड लायन्स विरुद्ध शानदार खेळी करत भविष्यात टीम इंडियात संधी मिळण्यासाठी दावा ठोकला. तनुषने अर्धशतक पूर्ण करत टीमला 400 पार पोहचवलं. टी ब्रेक दरम्यान तनुष 90 धावांवर नाबाद परतला. त्यामुळे तनुष तिसऱ्या आणि अंतिम सत्रात सहज शतक करेल, अशी आशा चाहत्यांना होती. मात्र तसं झालं नाही. टीम मॅनेजमेंटने तिसऱ्या सत्राची सुरुवात होताच डाव घोषित केला. त्यामुळे तनुषला शतकापासून वंचित रहावं लागलं.
तनुषला शतक करण्यापासून रोखलं!
तनुषने 108 बॉलमध्ये नॉट आऊट 90 रन्स केल्या. तनुषने या खेळीत 10 चौकार आणि 1 सिक्स लगावला. कर्णधार अभिमन्यूने डाव घोषित केला नसता तर तनुषला तिसरं फर्स्ट क्लास शतक पूर्ण करण्याची संधी होती. तसेच तनुषची रणजी आणि इराणी ट्रॉफीनंतर परदेशात शतक करण्याची पहिली वेळ ठरली असती. तनुषने अंशुल कंबोज यासह नवव्या विकेटसाठी 149 धावांची भागीदारी केली. त्यामुळे इंडिया ए टीमने 417 धावांपर्यंत मजल मारली. अंशुलने 51 धावांची खेळी केली. तर दुसऱ्या डावात इंग्लंडने 3 विकेट्स गमावून 32 रन्स केल्या. त्यानंतर सामना अनिर्णित राहिला.