Mumbai Train Accident : 'लोकल'ची गर्दी जीवघेणी; ठाण्यात मुंब्रा स्थानकात रेल्वेतून पडून चौघांचा मृत्यू; नऊ जखमी
esakal June 10, 2025 01:45 PM

ठाणे : गर्दीने खचाखच भरलेल्या व विरुद्ध दिशांनी जाणाऱ्या दोन उपनगरी गाड्यांना (लोकल) लटकून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागल्याने ते खाली कोसळून झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला तर अन्य नऊजण हे जखमी झाले आहेत. दिवा ते मुंब्रा स्थानकांदरम्यान सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये एका लोहमार्ग पोलिस कॉन्स्टेबलचाही समावेश आहे.

जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंब्रा स्थानकावरील दोन्ही फलाटे वक्रकार असल्याने दोन्ही लोकलमधील अंतर कमी झाल्याने हा अपघात झाला. दरम्यान, राज्य सरकारने या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाइकांना पाच लाखांची तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

एक लोकल सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ‘सीएसएमटी’हून कसाऱ्याकडे, तर दुसरी लोकल कसाऱ्याहून ‘सीएसएमटी’कडे जात होती. मुंब्रा स्थानकातील वक्राकार वळणावर दोन्ही लोकलच्या दरवाजात लटकलेल्या प्रवाशांच्या बॅगांचा एकमेकांना धक्का लागल्याने ते खाली पडले. पडलेले सर्व प्रवासी दरवाजातील पायदानावर उभे होते. कसाऱ्याकडे जाणाऱ्या रेल्वेतील गार्डने प्रवासी खाली पडल्याचे प्रशासनाला कळविले. त्यानंतर तातडीने बचावकार्य सुरू करीत सर्वांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पडलेल्यांपैकी चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली. मृतांमध्ये ठाणे लोहमार्ग पोलिस दलातील एका कॉन्स्टेबलचा समावेश आहे. या अपघातानंतर दोन्ही बाजूने लोकल ट्रेनची ये-जा सुरू असल्याने १० ते १५ मिनिटे मृतदेह त्याठिकाणी तसेच पडून होते. सगळ्या लोकल गेल्यानंतर हे मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नेत्यांनी घेतली धाव

या दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासनासह रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, आमदार निरंजन डावखरे, राजेश मोरे, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे, मनसे नेते अविनाश जाधव आदींनी रुग्णालयात धाव घेत जखमींची विचारपूस केली.

मृत आणि जखमी प्रवासी

उल्हासनगर येथील केतन दिलीप सरोज (वय २३), राहुल संतोष गुप्ता, कल्याण येथील विकी बाबासाहेब मुखदल (वय ३४) आणि अज्ञात अशी मृत चौघांची नावे आहेत. यामध्ये एकाचा मृतदेह छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय तर तिघांचे मृतदेह ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले होते. शिवा गवळी (२३), आदेश भोईर (२६), रिहान शेख (२६), अनिल मोरे (४०), तुषार भगत (२२), मनीष सरोज ( २६) , मच्छिंद्र गोतारणे (३९), स्नेहा धोंडे (२१) आणि प्रियांका भाटिया (२६) अशी जखमी झालेल्या प्रवाशांची नावे आहेत. शिवा आणि अनिल मोरे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे, तर सात जणांवर कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. अन्य चार जखमींवर मंगळवारी शस्त्रक्रिया करण्यात येईल.

पहिला दिवस ठरला शेवटचा

सोमवार हा आठवड्याचा पहिला दिवस असल्याने कामावर जाणाऱ्या नोकरदारवर्गाची मिळेल ती लोकल पकडून वेळेत कामावर हजर राहण्यासाठी धडपड सुरू होती. पण आता या दुर्दैवी घटनेत प्राण गमावलेल्या प्रवाशांचा आठवड्याचा पहिला दिवसच त्याच्या आयुष्याचा शेवटचा दिवस ठरला आहे. यासंदर्भात प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार कसाराहून मुंबईच्या दिशेने निघालेली लोकल डोंबिवलीपर्यंत गर्दीने ओसंडून आली होती. ही लोकल दिवा स्थानकात ९.१५ वाजेच्या सुमारास आली असता त्यामध्ये पाय ठेवायलाही जागा नव्हती. आत शिरता न आल्याने अनेक प्रवासी लोकलच्या दरवाजातच उभे राहून प्रवास करत असताना नियतीने त्यांच्यावर झडप घातली.

मुंब्रा रेल्वेस्थानकाजवळ झालेल्या भयंकर अपघातामुळे मी खूप व्यथित झालो आहे. ही अतिशय दुःखदायक घटना आहे. जखमींवर तातडीने व्यवस्थित उपचार करण्याचे निर्देश ठाणे आणि कळवा येथील रुग्णालयांना दिले असून मी स्वतःदेखील डॉक्टरांशी बोललो आहे. रेल्वेमार्फत या दुर्घटनेची चौकशी सुरू करण्यात आली असून या दुर्दैवी अपघाताचे नेमके कारण यातून समोर येईल.

- एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

रुळावर मृत्यूशी झुंज

अपघात घडल्यानंतर दोन्ही बाजूच्या रुळांवर कोसळलेले प्रवासी मृत्यूशी झुंज देत होते. कुणी फूटभर अंतरावर तर कुणी दोन फूट अंतरावर निपचित पडले होते. या दुर्घटनेची माहिती स्थानकातील प्रवाशांनी दिल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांचे एक पथक तातडीने घटनास्थळी पोचले. त्यांनी प्रवाशांना उचलण्यास सुरुवात केल्यानंतर दहा ते वीस मिनिटांमध्ये रुग्णवाहिका येऊन त्यांना पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले.

दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान झालेली घटना नेमकी कशामुळे घडली, याची चौकशी रेल्वे विभागाने सुरू केली आहे. या जखमींना तातडीने शिवाजी रुग्णालय आणि ठाणे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्थानिक प्रशासन समन्वय साधून काम केले जात आहे.

- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

लोकल ट्रेनमधील वाढती गर्दी हे अपघाताचे मुख्य कारण असले तरीही, असे अपघात घडल्यानंतर प्रवाशांवर खापर फोडून चालणार नाही. केंद्रीय रेल्वे प्रशासनाने या दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल घ्यायला हवी. मध्य रेल्वेनेही वेळेचे नियोजन करून लोकलच्या फेऱ्या वाढवायला हव्यात.

- शरद पवार, ज्येष्ठ नेते

गेल्या कित्येक वर्षांपासून आपण मुंबई रेल्वेसाठी एक वेगळे महामंडळ हवे, अशी मागणी करत आहोत. आजपर्यंत एकाही सरकारने या मागणीकडे लक्ष दिलेले नाही. राज्यांतील शहरांचे नियोजन आज पूर्णपणे विस्कटले आहे.

- राज ठाकरे, अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.