लेखिका, कॅन्सर जनजागृतीसाठी कार्यरत
‘माझ्याशिवाय कोणीच नाही समजणार माझं दुःख...’ ही भावना अनेक कर्करोग रुग्णांच्या मनात असते. आपल्याभोवती लोक असले, तरी आपल्या मनातले विचार, भीती, शंका या सगळ्याचं ओझं हलकं करायला एक ‘समजणारा’ हवा असतो. इथेच ऑनलाइन सपोर्ट ग्रुप्स आणि डिजिटल थेरपी आपल्याला हात देतात.
फेसबुक, व्हॉट्सॲप, टेलिग्राम किंवा CanSupport, LoveHealsCancer आणि i CanWin असे खास cancer support platforms अशा ठिकाणी हे ग्रुप्स मोठ्या प्रमाणावर काम करत आहेत.
ऑनलाइन सपोर्ट ग्रुप्समध्ये समान अनुभव, समान भावना असतात. घरबसल्या, मोबाईलवर एक ॲप उघडलं, की आपल्यासारखेच अनुभव असलेल्या व्यक्तींच्या गोष्टी समोर येतात. कोणी म्हणतं, ‘कालचा चेकअप नॉर्मल होता’, तर कोणी शेअर करतं, ‘आज थोडं हसावं वाटलं!’
इथं ना कोणी जज करतं, ना चेष्टा करतं. फक्त एकमेकांना ऐकून घेतलं जातं. आपण विचारू शकतो, ‘केमोच्या वेळी उलट्या कमी कशाने होतात?’ कुणी सांगतं, ‘माझ्या डॉक्टरांनी असं केलं... तू पण विचार करून बघ.’ सगळ्यात महत्त्वाचं मी एकटा नाही, ही जाणीव होते.
फक्त शरीर नाही, तर मनालाही थोडी ‘थेरपी’ हवी असते; पण प्रत्येक शहरात तज्ज्ञ मिळेलच असं नाही, वेळ मिळेलच असंही नाही. कारण कुणाला काय वाटेल, कोण आपल्याबद्दल काय विचार करेल हा हे प्रश्न रुग्णांच्या मनात असतोच. त्यामुळे खास मदत करणारी मोबाईल ॲप्स आणि ऑनलाइन सेशन्स हे आपले नवे मित्र. कारण तिथं तुम्हाला कोणीच ओळखणार नसतं आणि जज्जही करणारं नसतं. गुगल मीट, झूमवर थेट मानसोपचारतज्ज्ञांशी बोलता येतं.
Calm, Headspace, Mindhouse अशा ॲप्सवर मेडिटेशन, श्वसन क्रिया शिकता येतात. काही ॲप्स तर खास कॅन्सर सर्वायव्हर्ससाठी डिझाईन केलेले असतात. उदाहरणार्थ, Happify Health, Belong.life. मनातला गुंता बोलून दाखवणं, आणि त्यावर उत्तर मिळणं यातूनच रुग्ण हळूहळू स्वतःवर प्रेम करायला शिकतो.
लोक म्हणतात, ‘मोबाईलनं माणसं दूर झाली’; पण खरं सांगायचं तर मोबाईलनं माझ्यासारख्या हजारो रुग्णांना जगायला शिकवलं. घरबसल्या डॉक्टरांशी बोलता येतं, रिपोर्ट्स ऑनलाइन पाठवता येतात. नवं संशोधन, औषधं, टिप्स मिळतात आणि मुख्य म्हणजे, कोणी तरी समजून घेतंय,’ ही भावना मिळते.
कधी वाटायचं, ‘हे सगळं एकट्यालाच का होतं?’; पण ऑनलाइन सपोर्ट ग्रुप्सनी शिकवलं, ‘तू एकटा नाहीस. आम्हीही तुझ्यासारखेच आहोत. तू एकटा लढत नाहीस. आम्हीही लढतच आहोत, आपण लढून जिंकलो आहोत. आपण एकटे सहन करत नाहीये, तेव्हा अजून आपल्याला आधार येतो. मनात येणाऱ्या असंख्य प्रश्नांना.. कोणी जज्ज करून तुम्हाला उत्तर देत नाही.. कारण तेही त्याच मनस्थितीमधून गेलेले असतात, त्यातून बाहेर पडलेले असतात..
आजचा काळ तंत्रज्ञानाचा आहे; पण त्याचा वापर माणुसकी वाढवायला, एकमेकांना उभं करायला झाला, तर तो खरा प्रगतीचा मार्ग ठरतो. माझ्या कर्करोग प्रवासानंतर मी कर्करोग जनजागृतीच्या कार्यात स्वतःला झोकून दिलं. त्या काळात मनात अनेक प्रश्न उभे राहिले. भीती, संभ्रम, अनिश्चितता... आणि त्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं शोधण्यातून माझं ‘ब्यूटी ऑफ लाइफ’ हे पुस्तक जन्माला आलं. या पुस्तकामागची एकच भावना- कर्करोग या शब्दाभोवतीचं भय दूर करायचं आणि त्याऐवजी आशेचा किरण द्यायचा.