आळंदी, ता. १० ः संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीत येणाऱ्या वारकरी दिंड्यांच्या परिसरात विभागवार चोवीस तास पिण्याचे पाणी पुरविण्याचे नियोजन केले आहे. धर्मशाळा आणि तंबूत राहणाऱ्या वारकऱ्यांसाठी अठरा टॅंकरद्वारे मागणीप्रमाणे पाणीपुरवठा केला जाईल. वारकऱ्यांच्या सुरक्षासाठी नगरपरिषदेच्या वतीने शहरातील वर्दळीच्या आणि गर्दीच्या ठिकाणी एकशे तीस सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. मंदिर परिसर आणि प्रदक्षिणा रस्त्यावर बुधवारपासून (ता.११) पोलिस बंदोबस्तात अतिक्रमणविरोधी कारवाई करणार असल्याचे आळंदी नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
आषाढी वारी सोहळा आणि माउलींच्या पालखीचे प्रस्थान गुरुवारी (ता. १९) आहे. यानिमित्ताने वारीत येणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सुविधेसाठी नगरपरिषद कामाला लागली आहे. आळंदी नगरपरिषद तयारीबाबत माहिती देताना मुख्याधिकारी माधव खांडेकर म्हणाले, ‘‘वारी काळासाठी सतरा अधिकारी, दोनशे कर्मचारी, दीडशे स्वयंसेवक काम करतील. धोकादायक इमारतींचा सर्वे करून नोटीस पाठविणार आहे. शहरातील विद्युत खांबास धोकादायक वृक्षांच्या फांद्या छाटण्याचे काम सुरू आहे. सिद्भबेटमध्ये तीन ठिकाणी विद्युत खांब उभारणी केली. नदी घाटावरील विद्युत खांबांची दुरुस्ती सुरू आहे. शहरातील अठरा हायमास्ट दिव्यांची दुरुस्ती पूर्ण केली. जलशुद्धीकरण केंद्रावर अडीचशे केव्ही क्षमतेचे जनरेटर आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने जीवरक्षक बोट तैनात आहे. तीन अग्निशमन गाड्या तैनात आहेत. नदीपात्रात बुडू नये यासाठी तीन रेस्क्यू बोट आहेत’’
शहरातील वारी काळातील स्वच्छता आणि आरोग्याबाबत माहिती देताना विभागप्रमुख श्रद्धा गर्जे म्हणाल्या, ‘‘तिर्थक्षेत्र विकास आराखड्यामार्फत उभारलेल्या चौदा ठिकाणच्या सार्वजनिक स्वच्छतागृहांची सफाई पूर्ण झाली. या ठिकाणी सहाशे शौचालय सीट असून शहरातील नदीकाठी, बस स्टॅण्ड, चाकण रस्ता, वडगाव रस्ता भागात अठराशे फिरते शौचालये लावण्यात आली आहेत.’’
स्वच्छतेबाबत...
- शौचालयांसाठी स्वतंत्र अठरा टॅंकर उपलब्ध
- शहरातील कचरा दररोज उचलला जाणार
- रस्त्यांची सफाई पूर्ण
- धुरळणी आणि औषध फवारणी करणार
- इंद्रायणीच्या दोन्ही घाटांवर कचरा संकलनासाठी घंटागाड्या तैनात
- नाले सफाई आणि सर्व चेंबर दुरुस्ती पूर्ण
पाणीपुरवठ्याबाबत...
- पाणीपुरवठा सर्व जलवाहिन्यांची दुरुस्तीचे कामे पूर्ण
- जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर बेड क्लोरिनेशन बाबतची तयारी पूर्ण
- शहरात चार ठिकाणी टॅंकरमध्ये पाणी भरण्याची व्यवस्था
- धर्मशाळांना पाणी कमी पडल्यास पंधरा टॅंकर उपलब्ध करणार
- कचरा संकलनासाठी दहा घंटागाड्या, तीन कॉम्पॅक्टर तसेच ट्रॅक्टरची व्यवस्था
- तीन अग्निशमन दलाच्या गाड्या, मैला उपसा करण्यासाठी वीस सक्सन मशिन
अन्य व्यवस्था...
- महिलांसाठी तीन हिरकणी कक्ष
- महिलांसाठी इंद्रायणी काठी कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र केबिन
- धर्मशाळांना पाणी पुरवण्यासाठी पंधरा टॅंकर
- शहरात सीसीटीव्ही यंत्रणा
- घाटावर तीन रेस्क्यू बोटींची व्यवस्था
प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विभागप्रमुखांच्या बैठका घेऊन सूचना देण्यात आल्या आहेत. बहुतांश विभागाच्या वतीने कामे पूर्णत्वास गेली आहेत. वारकऱ्यांना वारी काळात चोवीस तास विभागवार पाणी आणि शहर स्वच्छतेची कामे केली जातील. आपत्ती व्यवस्थापनासाठी नगरपरिषदेमध्ये मध्यवर्ती केंद्र असून, सर्व विभागप्रमुख याठिकाणी पूर्णवेळ उपलब्ध असणार आहेत.
- माधव खांडेकर, मुख्याधिकारी, आळंदी नगर परिषद
आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्याच्या कडेला अडथळा ठरणारे विद्युत पोल काढून तसेच झाडाच्या फांद्या काढून तारांची दुरुस्ती करताना कर्मचारी.
आळंदी : जंतुनाशक पावडर मारताना नगरपरिषद कर्मचारी.