उरुळी कांचन - जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा २२ जून रोजी सकाळी पूर्व हवेलीत प्रवेश करणार आहे. परंतु, हवेलीत प्रवेश करताना वारकऱ्यांना पुणे-सोलापूर महामार्गाच्या दुतर्फा असणारा कचरा आणि पडलेले होर्डिंग याचा सामना करावा लागणार आहे. पालखी आगमनाच्या अनुषंगाने महामार्गाची कोणत्याही प्रकारची साफसफाई झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर ते उरुळी कांचन दरम्यान दुतर्फा अनेक किरकोळ विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. पथारी विक्रते, रसवंतीगृह चालविणारे, महामार्गावरून प्रवास करणारे प्रवासी, पुणे मुंबईच्या दिशेने जाणारे शेतकरी यांच्याकडून कचरा हा मोठ्या प्रमाणात महामार्गाच्या दुतर्फा टाकला जात आहे. या कचऱ्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.
मोकाट जनावर हा कचरा महामार्गावर आणतात. त्यामुळे पुण्याच्या दिशेने प्रवास करण्याऱ्या प्रवाशांना इथे कचरा डेपो आहे असं वाटत आणि त्यांच्याकडील रिकाम्या बाटल्या, प्रवासात उरलेले अन्न याठिकाणी फेकून दिले जाते. हीच परिस्थिती पुण्याहून सोलापूरच्या दिशेने जाताना आहे. भाजीपाला विक्रेते हे उरलेल्या मालाच्या गोण्या जागोजागी फेकून दिल्याचे पाहायला मिळते.
पुणे-सोलापूर महामार्गालगत मंगल कार्यालयाची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या महिन्यात विवाह तिथी अधिक असल्याने प्रत्येक कार्यालयात विवाह सोहळा पार पडला. सोहळा पार पडल्यानंतर सजावटीचे सामान, सुकलेली फुले, हार हा कचरा महामार्गाच्या दुतर्फा आणून टाकला जात आहे. मंगल कार्यालय मालकाला स्वच्छतेबाबत कोणत्याही प्रकारच्या सूचना दिल्या जात नाहीत. यावर कारवाई होत नाही.
अनधिकृत होर्डिंगवर कारवाई मात्र..
आगामी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यात हवेली तालुक्यातील लोणी काळभोर ते उरुळी कांचन पुणे-सोलापूर महामार्गावरील धोकादायक अनधिकृत होर्डिंगवर (जाहिरात फलक) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) कारवाई करण्यात आली. होर्डिंग खाली पाडण्यात आले. मात्र, कारवाई करून पाडण्यात आलेले हे होर्डिंग पुणे-सोलापूर महामार्गाच्या दुतर्फा तसेच पडलेल्या अवस्थेत अजूनही आहेत. जीवित हानी झाल्यास याकडे पीएमआरडीए प्रशासन लक्ष देणार का? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.