ड्रॉप घेणे - योग्य की अयोग्य?
esakal June 11, 2025 11:45 AM

बारावीनंतर अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते नीट, जेईई, एमएचटी-सीईटी, एनडीए, एनआयएफटी, एनआयडी इ. यांसारख्या स्पर्धा परीक्षांमधून उत्तीर्ण होऊन चांगल्या महाविद्यालयात प्रवेश घेण्याचे.

परंतु प्रत्येकाचा मार्ग सोपा नसतो. अनेकदा अपेक्षित गुण व रँक न मिळाल्याने विद्यार्थ्यांना शासकीय किंवा आवडत्या महाविद्यालयातील हवे ते कोर्स मिळत नाही किंवा बोर्डात किमान पात्रता गुण न मिळाल्याने प्रवेश मिळत नाही.

अशावेळी अनेक विद्यार्थी आणि त्यांचे पालक ‘ड्रॉप’ घेण्याचा निर्णय घेतात. म्हणजेच एक वर्ष पूर्णपणे अभ्यासासाठी घेऊन पुन्हा ती परीक्षा देण्याचा प्रयत्न. परंतु हा निर्णय योग्य आहे का? कोणासाठी योग्य आहे? याची चर्चा करणे आवश्यक आहे.

कुठल्या एंट्रन्ससाठी ‘ड्रॉप’ घेतला जातो?

मुख्यतः नीट (मेडिकल), जेईई (इंजिनिअरिंग), एमएचटी-सीईटी (इंजिनिअरिंग/फार्मसी), एनडीए (डिफेन्स), सीयूईटी (केंद्रीय विद्यापीठात प्रवेशासाठी), एनआयडी/एनआयएफटी (डिझाइन कोर्सेस), CLAT (कायदा प्रवेश), आयपी मॅट (मॅनेजमेंट) इ. स्पर्धा परीक्षांद्वारे प्रवेशासाठी विद्यार्थी ‘ड्रॉप’ घेतात.

‘ड्रॉप’ कोणी घ्यावा?

‘ड्रॉप’चा निर्णय भावनिक नसून विचारपूर्वक घेतलेला असावा. ‘नीट’ किंवा ‘जेईई’सारखी परीक्षा पुन्हा द्यायचीच आहे आणि त्यासाठी मेहनत करायची तयारी असल्यासच ‘ड्रॉप’ घेणे योग्य ठरू शकते. केवळ समाजाच्या दबावामुळे, मित्रांनी घेतले म्हणून किंवा ‘मागच्या वेळेस खूप कमी मार्क असतानाही पुन्हा प्रयत्न करतो’ अशा कारणांमुळे ‘ड्रॉप’ घेणे योग्य नाही.

‘ड्रॉप’ घेण्यासाठीचे निकष

१. स्पष्ट ध्येय असणे : विद्यार्थ्याला नक्की काय करायचे आहे याची स्पष्ट कल्पना हवी. फक्त ‘मेडिकल हवे’, ‘सीएसई हवे’ असे म्हणणे पुरेसे नाही, त्यासाठी मेहनत, वेळ, लागणाऱ्या स्कोअर व रँकचा अंदाज आणि त्यासाठीची मानसिक तयारी आवश्यक आहे.

२. पूर्वीचा स्कोअर तपासणे : मागील प्रयत्नात खूप कमी गुण मिळवले असतील, तर प्रवेशासाठी लागणारा स्कोअर व आपले आताचे गुण व त्यातील अंतर दुसऱ्या प्रयत्नात खरंच पूर्ण होईल का? पहिल्या प्रयत्नात झालेल्या चुका सुधारण्यायोग्य आहेत का? पार्शिअल (आंशिक) ‘ड्रॉप’ घेऊन बारावी पूर्ण केल्यानंतर प्रवेश घेतलेल्या पदवी अभ्यासक्रमासोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी करत वर्ष वाचवता येऊ शकते का? याचा वास्तविक विचार व्हावा.

३. शिस्त पाळण्याची तयारी : ‘ड्रॉप’ घेतल्यावर शाळा, महाविद्यालय/क्लासेस यांचे वेळापत्रक नसते, तसेच सोबतचे मित्र पुढे गेलेले असतात. त्यामुळे रोजचा अभ्यास, लिखाण, पाठांतरासाठी चार्टस् व माईंड मॅप वापरून शिस्तबद्ध अभ्यास करावा लागतो.

४. मनोबल आणि मानसिक आरोग्य : पुन्हा एक वर्ष त्याच परीक्षेसाठी आणि अभ्यासासाठी द्यावे लागणार आहे. त्यामुळे त्यासाठीची मानसिक तयारीही अत्यंत महत्त्वाची असते.

निष्कर्ष -

‘ड्रॉप’ किंवा ‘रिपीट’ हा प्रत्येकासाठी योग्य पर्याय नाही. ‘ड्रॉप’ हा अंतिम पर्याय असावा. प्रथम मिळालेल्या गुणांनुसार शिका आणि पुढे जा, किंवा इतर कोर्सेसचे पर्याय शोधा, असे मार्गही अनेकदा योग्य ठरतात. मात्र, योग्य कारण, आत्मपरीक्षण, स्पष्ट उद्दिष्ट व ध्येय, ठाम निर्धार, योग्य तयारी व मार्गदर्शन, प्रामाणिक मेहनत आणि मानसिक ताकद असल्यास ‘ड्रॉप’मधून यशस्वी पुनरागमन शक्य होऊ शकते. निर्णय घेताना वेळ, पैसा, प्लॅन ‘बी’ आणि मानसिक स्थैर्य यांचा विचार करून निर्णय घ्यायला हवा.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.