- डॉ. सचिन जैन, संस्थापक-संचालक, एसकेवायआय कम्पोझिट प्रायव्हेट लिमिटेड
सर्वांगीण विकासासाठी शरीराबरोबर मन शांत आणि कार्यरत राहणे खूप महत्त्वाचे आहे. या आधीच्या लेखांमध्ये खेळ, व्यायाम, विचारसरणी यावर भर दिला.
मनाला स्वतंत्र आणि स्पष्ट का व कसे ठेवावे म्हणजे आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करता येईल आणि यशाच्या दृष्टीने पुढे जाता येईल याचा आज विचार करूयात.
अनेकदा आपण नको त्या गोष्टीला अवास्तव महत्त्व देतो. आपली सगळी ऊर्जा, निकष काहीही साध्य न होणाऱ्या गोष्टींसाठी खर्च करतो. ते अर्थातच अनावश्यक असते आणि तरी प्राप्त नाही झाले म्हणून आपला हिरमोड होतो, मानसिक त्रागा करून घेतो.
थोडा विचार केल्यास आपल्या लक्षात येत की ज्या गोष्टीचा आपण विचार करत आहोत, त्याचा आपल्या जीवनात कदाचित अणू भर देखील हातभार नसतो, आणि आपल्या भविष्यात तर कदाचित काहीच नाही. अशा अनेक प्रकारच्या गोष्टी, प्रसंग प्रत्येकाच्या वैयक्तिक, व्यावसायिक किंवा नोकरीत येत असतात, त्यावर कितीवेळ खर्च करावा आणि ते सोडून पुढे निघावे, हे शिकणे महत्त्वाचे आहे.
संकुचित आणि संशयी विचारसरणी देखील आपल्या अपयशाकडे ढकलू शकते. लाकडाला किड लागावी तशी ईर्षा मनुष्याच्या जीवनाला खाऊन जाते. म्हणूनच अशी मानसिकता आणि विचारसरणी आपण बदलायला हवी.
आपल्या व्यावसायिक, वैयक्तिक आयुष्यातही असे अनेक प्रसंग येतात, कधी कधी आपली भूमिका बदलत जाते, याचे भान ठेवून आपली वागणूक आणि निर्णय घेतल्यास यशाच्या प्रवाहात येणारे अडथळे अलगदपणे दूर करता येऊ शकतात.
आपण नको त्या विषयावर फार विचार मंथन केले तसेच संशयी, संकुचित विचार देखील आपल्या विकासाचे गणित चुकवू शकतात. आपण आपल्या सहकाऱ्यावर, पाल्यावर जेवढा विश्वास ठेवू तेवढे ते त्यांच्या परीक्षेत पूर्ण उरतात.
जोपर्यंत कर्ण युद्धभूमीवर लढत होत, दुर्योधनाला कसलीही चिंता नव्हती कारण त्याला त्यांच्या मैत्रीवर पूर्ण विश्वास होता, तरच आपल्या टीम मेंबर्सवर आपण जेवढा विश्वास ठेवून काम करून घेवू शकतो तेवढे त्यांच्या कौशल्यांवर किंवा गुणवत्तेवरच वर बोट ठेवले तर त्याचे मनोबल तसेच ढवळू लागते आणि त्यांचे कामाचे स्वरूप अजून खालावत जाते. त्यामुळे आपण जेवढे आपले विचार उदारमतवादी, नको त्या अवास्तव गोष्टीवर खर्च ना करता आपल्या ध्येयाकडे वळवले तर यशाची भरारी घेण्यास विलंब होणार नाही.