बीड: बीड जिल्ह्यात लग्नाळू मुलांचे लग्न लावून फसवणारी टोळी सक्रिय असल्याचे समोर आलं आहे. या प्रकरणात दोन गुन्हे दाखल झाले असून सात जणांच्या टोळक्याला पोलिसांनी अटक केली आहे. आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाणे आणि वडवणी पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल झाले आहेत. आष्टी तालुक्यातील कारखेल बुद्रुक येथे एका मुलाचा विवाह जुळत नसल्याने काही जणांनी मध्यस्थी केली. यासाठी मुलाच्या कुटुंबाने जवळपास मध्यस्थी व्यक्तींना पावणे सहा लाख रुपये देऊ केले. मात्र पैसे देऊन देखील नवविवाहित पत्नी सोबत राहत नाही. ही बाब लक्षात येताच फसवणुकीचा प्रकार समोर आला आणि वर बापाच्या फिर्यादीवरून अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आठवडाभरात असाच काहीसा दुसरा प्रकार वडवणी पोलीस ठाणे हद्दीत ऊसतोड कामगारांसोबत झाल्याचे समोर आले आहे. लग्नासाठी ऊसतोड कामगार मुलाने तीन लाख रुपये दिले. परंतु लग्नानंतर दोनच दिवसात नवविवाहितेने धूम ठोकली. या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली. दरम्यान नागरिकांनी खात्री करूनच लग्न जुळवावे असे आवाहन बीड पोलिसांनी केले आहे.
नवनीत कावंत यांनी माहिती देताना सांगितलं की, बीडच्या आष्टी मधील फसवणूक झालेल्या मुलाचे पालक माझ्याकडे आले होते आणि वडवणीचे तरूणाचे पालकांनी देखील तक्रार केली होती. तेखील पोलिसांनी टोळीला पकडण्यासाठी ट्रॅप लावला. ही टोळी लग्नाचा अमीष दाखवतात आणि फसवणूक करतात, या मुलांची लग्न होत नाहीये. त्यामुळे ते त्यांना मुली देण्याचा प्रयत्न करतात. लग्न देखील करून देतात, लग्न केल्यानंतर पुढच्या सात-आठ दिवसानंतर या मुली घरातील सोनं आणि पैसे घेऊन पळून जातात तुम्ही त्यांना काही सांगितलं किंवा बोलला तर ते दुसऱ्या लग्न करून देण्याबद्दल बोलतात, पुन्हा लग्न वगैरे लावून देऊ असं सांगतात, त्यानंतर देखील हा फसवणुकीचा प्रकार चालूच राहतो. आष्टीमधील तक्रार आमच्याकडे आली होती त्यामध्ये आम्ही ट्रॅप लावून त्या टोळीला पकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे, वडवणीचा देखील तोच विषय होता, पोलिसांकडून नागरिकांना आवाहन आहे, की लग्न आहे तुमच्या आयुष्यात एकाच वेळी घडते त्यामुळे तुम्ही सर्व गोष्टी तपासून आणि खात्री करूनच तुम्ही ते केलं पाहिजे अशा टोळीना किंवा गोष्टींना बळी पडू नका, सावध रहा. तुम्हाला त्याबद्दल काही समस्या वाटली, शंका वाटली तर तुम्ही पोलिसांकडून येऊन मदत मागू शकता, असंही नवनीत कावंत यांनी म्हटलं आहे.
आणखी वाचा